मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
Mumbai News: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मढ आयलंड आणि वर्सोवा यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी केबल-स्टेड पुलाच्या उभारणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पाच्या मार्गात येणारी १,२३७ खारफुटीची झाडे तोडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे सुमारे २,३९५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयाने परवानगी देताना पर्यावरणाशी संबंधित विविध प्राधिकरणांनी घालून दिलेल्या अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रकल्पाबाबत ही परवानगी देण्यात आली.
वर्सोवातून रस्तेमार्गे मढ येथे जाणाऱ्या वाहनचालकांना सध्या मोठा वळसा घालावा लागतो. अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर, ओशिवरा आणि मलाडमार्गे मढ-मार्वे रोडपर्यंत पोहोचावे लागते. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास प्रवासासाठी मोठा वेळ खर्च होतो.
वर्सोवा जेटी आणि मढदरम्यान सध्या फेरीबोटीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र भरती-ओहोटीच्या स्थितीनुसार, विशेषतः कमी भरतीच्या काळात या सेवेवर मर्यादा येतात. त्यामुळे मढ आणि वर्सोवा यांना कायमस्वरूपी रस्तेमार्गे जोडण्याच्या उद्देशाने पुलाचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला.
प्रस्तावित प्रकल्पांतर्गत मलाड खाडीवर २,०६४ मीटर लांबीचा चारपदरी केबल-स्टेड पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल मढ आयलंड आणि वर्सोवा यांना थेट जोडेल. पुढे तो २७.४५ मीटर रुंदीच्या विकास आराखडा रस्त्याला तसेच कोस्टल रोडच्या नियोजित मार्गाला जोडला जाणार आहे.
या पुलामुळे मढ आणि वर्सोवा यांच्यातील थेट कनेक्टिव्हिटी वाढण्याबरोबरच पश्चिम उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी होण्याची अपेक्षा आहे. एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक अन्य मार्गाकडे वळवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, अशी भूमिका न्यायालयात मांडण्यात आली.
प्रकल्पाला आवश्यक पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याचे महापालिकेने न्यायालयाला सांगितले. प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या खारफुटींची भरपाई म्हणून उत्तर कोकण खारफुटी विभागाच्या अखत्यारितील सुमारे नऊ हेक्टर क्षेत्रात ३९ हजार खारफुटींची रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या रोपांची पुढील दहा वर्षे देखभाल आणि त्यासंबंधित कामांसाठी १.४२ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे महापालिकेने न्यायालयात सांगितले.
मढ-वर्सोवा पुलामुळे दोन्ही भागांतील प्रवासाचे अंतर सुमारे १८ ते २० किलोमीटरने कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या रस्तेमार्गे या प्रवासासाठी वाहतुकीच्या परिस्थितीनुसार जवळपास दीड तास लागू शकतो. नवीन पूल कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी काही मिनिटांवर येईल आणि सुमारे ७० ते ८० मिनिटांची बचत होईल, असा महापालिकेचा दावा आहे.
या प्रकल्पामुळे मढ, मालाड आणि वर्सोवा परिसरातील नागरिकांना थेट जोडणी मिळणार आहे. त्याचबरोबर न्यू लिंक रोड, एस. व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीचा काही भार कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.






