मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. 19 सप्टेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी जरांगे यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. आपण पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटी-शर्तींचं पालन करू, असं हमीपत्रही त्यांनी दिलं होतं. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शाळा, रुग्णालयं, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्यात आली आहे.
याआधी झालेल्या जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा दाखलाही पोलिसांनी दिला आहे. त्या वेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते. सीएसएमटी परिसर आणि महानगरपालिका मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे.
मागील वेळी आझाद मैदानात पाच हजार लोकांची मर्यादा ठेवून परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा मोठी गर्दी जमल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी परवानगी देताना पोलिसांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
यंदा मुंबईत गणेशोत्सवाचा माहोल असल्याने आधीच मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. विसर्जन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक आणि सुरक्षेचं मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीत जरांगे यांच्या आंदोलनामुळे आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर आता पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जरांगे या निर्णयावर काय भूमिका घेतात आणि 19 सप्टेंबरच्या मुंबई दौऱ्याबाबत पुढचा निर्णय काय घेतात, याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका






