
महाराष्ट्रात 25 जूननंतर मान्सून
मुंबई : राज्यात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याने पावसाची प्रतीक्षा वाढली असतानाच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आगामी 15 दिवसांच्या विस्तारित अंदाजाने दिलासा आणि सावधगिरीचा असा दुहेरी संदेश दिला आहे. १८ ते २४ जूनदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती तुलनेने कमकुवत राहण्याची शक्यता असून, २५ जूननंतर मात्र मान्सूनला पुन्हा वेग मिळून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. यात कोकण पट्टयात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे सोलापूर मार्गे पुढे सरकत असली तरी अरबी समुद्रावरील वारे कमकुवत असल्याने पुढील काही दिवस मान्सूनचा प्रवास संथ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ते २० जूनदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट (हिटवेव्ह) जाणवू शकते. तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणात मात्र उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, २५ जून ते १ जुलै या कालावधीत मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरील हवेचा प्रवाह वाढणे आणि विविध चक्राकार प्रणालींच्या निर्मितीमुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीला गती मिळू शकते. विशेषतः कोकण किनारपट्टीवर, गोवा लगतच्या भागात तसेच घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
देशभरातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता
पश्चिमी विक्षोभ, चक्रीय वारे आणि सक्रिय मान्सूनच्या प्रभावामुळे देशभरातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता असून, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे.
वादळी पावसाचा नाशिक शहर-जिल्ह्याला तडाखा
मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने काही तासातच रस्त्यांवर पाणीच पाणी वाहू लागले. खोदून ठेवलेले रस्ते, वाहतूकीत केलेला बदल व अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळल्या तर वीज पुरवठाही खंडीत झाला. रस्त्यावर सर्वच कचरा वाहून आल्याने धुळधाण उडाली.