मुंबई पावसाने भिजली, तरीही तलाव अजूनही तहानलेले, पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी? (फोटो सौजन्य-X)
Mumbai Lake Water Level in Marathi : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. रविवारी दिवसभर पावसाचा तडाखा अनुभवायला मिळाला. सोमवारीही हा जोर कमी झाल्याचे दिसतं नव्हते. असं असलं तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमधील पाण्याची पातळी सोमवारी 10 टक्क्यांपेक्षा कमीची राहिली आहे. मुंबईला याच तलावांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आतापर्यंत तलावांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली नाही. १६ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये फक्त ८.६०% पाणीसाठा होता. परिस्थिती अशी आहे की मुंबईत २४ तासांत १०० मिमी पाऊस पडत असताना, तलावांच्या भागात ५० मिमी देखील पाऊस पडत नाही.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी आणि विहार हे दोन तलाव वगळता, बहुतेक तलाव मुंबईबाहेर आहेत. मुंबईत चांगला पाऊस झाल्यामुळे या दोन्ही तलावांमधील पाणीसाठा वाढला आहे.
१६ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १२४४७१ एमएलडी पाणीसाठा होता, जो मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांच्या एकूण १४४७३६३ एमएलडी क्षमतेच्या केवळ ८.६०% आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर तलावात ३३५९० एमएलडी पाणीसाठा आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या २६.०५% आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत या तलाव क्षेत्रात १२८ मिमी पाऊस पडला आहे.
तानसा तलावात १३६३० एमएलडी पाणीसाठा आहे. जो त्याच्या एकूण क्षमतेच्या ९.३९% आहे. आतापर्यंत येथे १३० मिमी पाऊस पडला आहे. मध्य वैतरणा तलावात २०६५५ एमएलडी पाणीसाठा आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या १०.६७% आहे. या तलाव क्षेत्रात १५४ मिमी पाऊस पडला आहे.
भात्साच्या तलावात ४३००३ एमएलडी पाणी आहे, जे तलावाच्या एकूण क्षमतेच्या फक्त ६% आहे. या तलावाच्या क्षेत्रात आतापर्यंत २१६ मिमी पाऊस पडला आहे. अप्पर वैतरणा तलावात २०६५ एमएलडी म्हणजेच तलावाच्या एकूण क्षमतेच्या ०.९१% पाणीसाठा आहे. विहार तलावात ९२२५ एमएलडी पाणीसाठा आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या ३३.३०% आहे. या तलावाच्या क्षेत्रात आतापर्यंत ११३ मिमी पाऊस पडला आहे. त्याच वेळी, तुळशी तलावात २३०३ एमएलडी पाणी आहे, जे तलावाच्या क्षमतेच्या २८.६२% आहे. येथे २२७ मिमी पाऊस पडला आहे.
बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तलावांमध्ये पाणी पातळी कमी असल्याने, राज्य सरकारने एप्रिलमध्ये राखीव कोट्याच्या पाण्याचा वापर करण्यास परवानगी दिली होती. बीएमसीला भातसा तलावातून १.४ लाख एमएलडी पाणी आणि अप्पर वैतरणा तलावातून ९३५०० एमएलडी अतिरिक्त पाणी राखीव कोट्यातून मिळाले आहे. बीएमसीने १० जूनपासून त्याचा वापर सुरू केला आहे. राखीव कोट्यातील पाणी वापरून, ३१ जुलैपर्यंत पाणीकपातीची आवश्यकता राहणार नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, जूनमधील ही परिस्थिती असामान्य नाही, कारण जुलैमध्ये चांगला मान्सून पाऊस पडतो. जुलैमध्येच तलावांची पाणीपातळी झपाट्याने वाढते. तरीही, अद्याप पाणीकपात जाहीर केलेली नाही.
१६ जूनपर्यंत तलावांमध्ये उपलब्ध पाणीसाठा
– वर्ष २०२५ -१२४४७१ एमएलडी- ८.६०%
– वर्ष २०२४- ७८४९९ एमएलडी- ५.४२%
– वर्ष २०२३-१२५०५५ एमएलडी- ८.६४%