
Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार
महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीला विजय मिळेल, असा विश्वास शायना एन. सी यांनी व्यक्त केला. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष दिवसागणिक मजबूत होत आहे. जनहिताच्या निर्णयांमुळे शिवसेनेवरील विश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आरोग्य सेवेचे महत्व सांगितले होते. मुंबईतील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गरिबांना उत्तम आरोग्य सेवेसाठी कार्यरत आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी ही योजना सुरु कऱण्यात आली होती, असे शायना एन.सी म्हणाल्या.
आज राज्यभरात २५९ आपला दवाखाना कार्यरत आहेत. या दवाखान्यांमधून दर महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी उपचार घेतले. आतापर्यंत आपला दवाखानामधून १ कोटी ४१ लाख रुग्णांनी उपचार घेतले. हा उपक्रम गरिबांसाठी वरदान ठरत असून शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा विचार आणखी भक्कम करत असल्याचे शायना एन.सी म्हणाल्या. विरोधी पक्ष केवळ आरोप करण्याचे काम करते. त्यांची समाजाशी नाळ तुटलेली आहे. त्यामुळेच नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली, अशी टीका शायना एन.सी यांनी केली. राज्यातील जनता शिवसेने सोबत आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे नगर परिषदांच्या निकालांची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये दिसेल, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील नोंदविला आहे. पर्यावरणपूरक काम होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.