
'50 ग्रॅम पावडर टाकेन...' पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक, 'पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?' असा सवाल केला उपस्थित
मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जुलै रोजी संयुक्त मोर्चाची घोषणा केली. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा हा मोर्चा निघणार असून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. यावेळी त्यांनी पोलिसांच्या व्हायरल व्हिडीओवरून संताप व्यक्त करत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी ’50 ग्रॅम पावडर टाकेन’ मुंबई पोलीस कर्मचाऱ्याच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत “हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय NEET पेपरफुटी, दिल्लीतील CJP आंदोलन आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवरून भाजप सरकारवरहि त्यांनी जोरदार निशाणा साधला. पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारांवर तातडीने कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनासाठी जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एका पोलिसाने “50 ग्रॅम पावडर टाकेन” अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ त्यांच्या पाहण्यात आला आहे. याबाबत त्यांनी संताप व्यक्त करत, “हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर कुठून आली?” असा सवाल उपस्थित केला. हा व्हिडिओ आपण मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, “पेपरफुटीला जे जबाबदार असतील त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या. भविष्यात अशी घटना पुन्हा होणार नाही, याची सरकारने हमी द्यावी. हे आधी केले असते, तर इतका मोठा संघर्ष निर्माण झाला नसता.” त्यांनी भाजपवर टीका करत, काँग्रेसच्या काळात ज्या आंदोलनांवर भाजपने राजकारण केले, आज त्याच प्रकारची भूमिका भाजप घेत असल्याचा आरोप केला.
संयुक्त मोर्चाबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क येथे जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी सुमारे 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान मोर्चा सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने रवाना होईल. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. केवळ राष्ट्रीय तिरंगा हातात घेऊन नागरिक सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरे म्हणाले की, हा प्रश्न कोणत्याही पक्षाच्या राजकारणाचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. “हा मतपेटीचा विषय नाही, हा न्यायाचा विषय आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांनाच देशद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती वाढत आहे,” असा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि देशभरातील वाढता संताप लक्षात घेता, सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता संवादातून प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.