
मुंबईत उष्णतेचा कडेलोट! २४ तासात अलर्ट बदलला,कुठे किती तापमान?
विशेष म्हणजे, काल मुंबईतील दोन ठिकाणी तापमान ४० अंशांच्या घरात गेले होते, तर आज त्यात भायखळा परिसराची भर पडल्याने उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपनगरांमध्ये दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ७.६ अंश सेल्सिअस जास्त होते. आतापर्यंतच्या नोंदींनुसार, १९५६ पासून आजपर्यंत मुंबईत ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक कमाल तापमानाची नोंद फक्त ६ वेळा झाली आहे.
इतर भागांमध्येही उष्णतेची झळ मोठ्या प्रमाणात जाणवली. बांद्रा येथे ३९.७°, विद्याविहार ३९.५°, चेंबूर ३८.८° आणि दहिसर ३८.८° तापमानाची नोंद झाली. दरम्यान, उत्तर कोकणात उष्णलहरी ते तीव्र उष्णलहरीची स्थिती प्रत्यक्षात दिसून आली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस हे तापमान सरासरीपेक्षा ७.६ अंश अधिक नोंदले गेले. तर डहाणू येथे ४० अंश सरासरीपेक्षा ९.६ अंश अधिक तापमानासह तीव्र उष्णलहरीची स्थिती निर्माण झाली. तर ठाणे येथे ३९.२ अंश हे तापमान सरासरीपेक्षा ५.४ अंश अधिक नोंदवले गेले. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि उन्हापासून बचाव करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईतील काही भागात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील राम मंदिर परिसरात ४२.४ अंश सेल्सिअस, पूर्व उपनगरात ४१.६ अंश सेल्सिअस आणि दक्षिण मुंबईमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वांद्रे येथे ३९.७ अंश सेल्सिअस, विद्याविहारमध्ये ३९.५ अंश सेल्सिअस, चेंबूर आणि दहिसरमध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एमएमआर प्रदेशात, पालघरमध्ये ४१.२ अंश सेल्सिअस, डोंबिवलीमध्ये ४० अंश सेल्सिअस, कल्याणमध्ये ४१.८ अंश सेल्सिअस, नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये ४१.६ अंश सेल्सिअस आणि पनवेलमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.