
छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर! मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात
वडापाव, सामोसा, बुर्जी पाव आणि चायनीज गाडीवाल्यांचा असा दावा आहे की, ग्राहक येत आहेत पण पदार्थ बनवता येत नाहीत, त्यामुळे महिनो-दरमहा कमाईचे मोठे नुकसान झाले आहे. काही गाड्यांनी तरी घरगुती सिलेंडर वापरून जुगार चालवण्याचा प्रयत्न केला, पण पुरवठा पुरेसा नसल्यामुळे व्यवसायावर फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांत एस्मा कायद्याअंतर्गत आवश्यक सेवा सुरु ठेवण्याच्या आदेशामुळे गाडीवाल्यांना काही प्रमाणात आश्वासन मिळाले आहे, परंतु वास्तविक गॅस उपलब्ध न झाल्याने व्यवसाय ठप्प आहे. स्थानिक गाडीवाले म्हणतात, “ग्राहक येतात, पैसे विचारतात, पण पदार्थ बनवता येत नाहीत. बुर्जी पावसारखे पदार्थ बनवण्यासाठी गॅस आवश्यक आहे, तो नाही. एस्मा कायदा आहे म्हणतात, पण व्यवहारात काही फरक पडलेला नाही.” विशेषत: स्ट्रीट फूड व्यवसायावर गॅस तुटवडा भयानक परिणाम करतो. ग्राहकही फसत आहेत. काही ठिकाणी गाडी बंद असल्याने ग्राहक रस्त्यावरच उभे राहतात, अशी तक्रार केली जाते.
“अर्धा सिलेंडर उरला आहे. तो सिलेंडर घेऊन मी धंद्यासाठी रस्त्यावर उतरू शकत नाही. त्यामुळे मला धंदा बंद ठेवावा लागणार बहुधा. माझ्याकडे ४ ते पाच कामगार आहेत. त्यांचेही वांदे होणार. गेल्या ४ दिवसापासून सिलेंडर मिळणं कठीण झालं आहे.”
-राजू रेडीज, चायनीज गाडी मालक, पवई
“मला डिझायर फाऊंडेशनने वडापावची गाडी दिली आहे. पण गेल्या ४ दिवसापासून काय करूं हा प्रश्न माझ्या समोर आहे. माझा संसार बंद होणार. सरकारने घरातील गॅस दिला तरी इकडे कमाई नाही झाली तर घरातला गॅस पेटणार कसा?”
-स्मिता वाघमारे, सामोसे गाडी मालक
“मी छोटे सिलेंडर वापराचा विचार करत होतो. मात्र तो आता शक्य दिसत नाही. नुकसान होणार असल्याने धंदा बंद ठेवून घरी बसावं लागणार.”
-प्रकाश भुरे, वडा व्यवसायिक
“अशी वेळ येईल याची जाणीव नव्हती. माझी किचन व्यवस्था इंडक्शन करून घेतल्याने निर्धास्त आहे. मात्र हॉटेल-कॅफेसाठी आजही सिलेंडर महत्वाचे आहेत. युद्धजन्य परिस्थितीत इंडक्शन किचन मदतपूर्ण ठरत आहे.”
-एस. चंद्रशेखर, फ्रेंड्स कॅफे, ठाणे
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या प्रश्नावर हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढत असताना आहार (हॉटेल संघटना) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पेट्रोलियम मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत संघटनेने सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत निवेदन दिले असल्याची माहिती आहार संघटनेचे सचिव सुनील शेट्टी यांनी दिली. दरम्यान मंत्री भुजबळ यांनी आहार संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले व दिवसभरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. मात्र तत्काळ कोणतेही ठोस आश्वासन देणे शक्य नसल्याचे भुजबळ यांनी चर्चेतूनच आहार संघटनेला स्पष्ट केले.
मात्र गॅस सिलेंडरची समस्या केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून सध्या ती जागतिक पातळीवर निर्माण झाल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तत्काळ कोणतेही ठोस आश्वासन देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीत काही दिलासा देता येईल का, याकडे लक्ष दिले जाईल, अशी माहिती आहार संघटनेचे सचिव सुनील शेट्टी यांनी दिली.
दरम्यान, या प्रश्नावर काल दिल्लीत झालेल्या चर्चेतही कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी वाढली आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक लहान-मोठ्या हॉटेल व फूड व्यवसायांवर परिणाम होत असून कामगारांवरही त्याचा फटका बसत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास राज्यभर बिकट स्थिती उदभवेल असे हॉटेल व्यावसायिकांकडून समजत आहे.