
30 व 31 मार्च 2026 दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. काही भागात कडाक्याची उष्णता आहे तर काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नुकसानीचे पंचनामे
सरकारकडून सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कायम राहणार आहे. मार्च महिना संपत आला आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. आजही राज्यातील काही जिल्हह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यातच कोल्हापूरमध्ये देखील अवकाळी पावसाने सुरुवात केली. कोल्हापूर, सातारा सांगली पट्ट्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यात सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होत असून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. विशेषतः महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर, पाचगणी, रुईघर, म्हसवे, सरताळे, सर्जापूर, बेलावडे, सोनगाव आणि आलेवाडी या परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागांत विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.