
Devendra Fadnavis
नागपूर : देशाच्या राजकारणात सध्या ‘Gen Z’ हा अतिशय महत्वाचा विषय झाल्याचे दिसत आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील ‘Gen Z’ आंदोलनानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी ‘Gen Z’ ची ताकद ओळखून त्यांच्या प्रश्नांना महत्व दिले असल्याचे दिसत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ‘Gen Z’ सोबत संवाद साधून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष अधोरेखित केले. अध्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात ‘Gen Z’ सोबत संवाद साधत त्यांचे विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जेन झीमधील तरुणांशी संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवासाबद्दल भाष्य केले. यासह यशानंतर येणाऱ्या दबावावरही भाष्य केले. मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यासोबत मानसिक दबावही निर्माण होतो. मात्र, हा दबाव कसा हाताळायचा, याबाबत फडणवीसांनी त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले.
तरुणांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याची इच्छा असणे ही सकारात्मक बाब असल्याचे सांगत फडणवीसांनी भारतीय लोकशाहीची ताकद अधोरेखित केली. आपल्या राजकीय प्रवासाकडे पाहताना मुख्यमंत्री होऊ, असा विचार सुरुवातीला कधीच केला नव्हता, असे त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश केला त्यावेळी सत्ता मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. विरोधी पक्षात राहून आंदोलन आणि संघर्ष करण्यासाठीच राजकारणात आलो होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली.
‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
आपला प्रवास नगरसेवकापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला. त्यामुळे भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनात ठाम ध्येय असेल आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते, असे फडणवीस म्हणाले.
दबावाबाबत बोलताना त्यांनी राजकारणाला व्यवसाय मानत नसल्याचे स्पष्ट केले. सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याचे राजकारण हे प्रभावी माध्यम असल्यामुळे आपण या क्षेत्रात आलो, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी जीवनातील संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला. तरुण वयात आंदोलनांमध्ये सहभागी होताना अटक, पोलिसांचा सामना आणि तुरुंगवासाचा अनुभव आल्याचे फडणवीसांनी सांगितले. या संघर्षामुळे कठीण परिस्थितीचा सामना करण्याची मानसिक तयारी निर्माण झाली, असे त्यांनी नमूद केले.
यश मिळाल्यानंतर येणारा दबाव वेगळा असला तरी संघर्षाच्या काळातच त्याला सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते, असा संदेश फडणवीसांनी यावेळी तरुणांना दिला. ध्येय मोठे ठेवण्यासोबतच त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ