
पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. हवामान विभागाने पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज दिल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. ज्यांच्याकडे विहीर किंवा बोअरवेलची सुविधा आहे, त्यांनी धानाची रोपे वेळेत तयार केली. आता ही रोपे शेतात लावण्याची वेळ आली असतानाच विजेच्या अडथळ्यामुळे शेतीची कामे रखडत आहेत.
पचखेडी परिसरातील अनेक शेतकरी मोटार पंपाच्या मदतीने शेताला पाणी देतात. मात्र, दिवसा वीज उपलब्ध असली तरी ती वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. काही वेळा वीज गेल्यानंतर अर्धा तास ते एक तास पुरवठाच होत नाही. त्यामुळे मोटार बंद पडते आणि शेतातील काम थांबते. धानाची रोपे जास्त दिवस पाण्याविना ठेवली तर त्यांची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे वेळेत रोवणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आधीच पावसाने साथ सोडली आहे, त्यात विजेची समस्या वाढल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
शासनाकडून शेतीसाठी नियमित वीज पुरवठ्याची घोषणा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित फायदा मिळत नाही. दिवसभर विजेचा असा लपंडाव सुरू राहणार असेल, तर रात्रीच्या लोडशेडिंगमध्ये काही प्रमाणात सवलत देऊन अतिरिक्त वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पाणी असूनही वीज नसल्यामुळे पिके वाचवणे कठीण होत आहे. रोवणीचा हंगाम हातातून गेला तर संपूर्ण वर्षाचे गणित बिघडू शकते. त्यामुळे महावितरणने तातडीने या समस्येची दखल घेऊन अखंडित वीज पुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या शेतीतील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. अशा वेळी पाऊस आणि वीज या दोन्ही गोष्टींची साथ मिळाली तरच शेतकऱ्यांचे कष्ट फळाला येतील. अन्यथा यंदाचा हंगाम अनेकांसाठी आर्थिक अडचणी वाढवणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.