
वादळी पावसाचा शहर-जिल्ह्याला तडाखा! पाणीच पाणी, वीजपुरवठा खंडित; खड्डेमय रस्त्यांनी नागरिक हैराण
गेल्या काही दिवसात तापमान ३६ ते ३७ अंशावर असतांनाच हवेत उकाडा निर्माण झाला. उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, गाफील शहरवासियांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडविली. दुपारच्या सुमारास ढगांनी गर्दी करीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने काही वेळातच वाहतूक थंडावली. झाडाच्या जुन्या फांद्या कोसळण्याच्या व काही ठिकाणी पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. रस्त्यावर अवघ्या काही वेळेतच सर्वत्र पाणी साचले. ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते व मातीमुळे चिखल वाहून रस्ते निसरडे झाले तर वीज पुरवठा खंडीत झाल्याने अगोदरच अंधारून आलेल्या वातावरणात सर्वत्र अंधार पसरला. रस्त्यांवरील विक्रेते, हातगाडीवाल्यांची सामान आवरण्यासाठी धावपळ उडाली. घराबाहेर कामानिमित्त पडलेल्या नागरिकांनी पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणांचा आश्रय घेतला. साधारणतः अर्धातास धुवाँधार कोसळलेल्या या पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्याने नाशिककरांना हायसे वाटले.
पाऊस सुरू होताच अवघ्या काही वेळेतच वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा परिणाम शहरातील रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणेवर झाला. सिग्नल बंद पडल्याने प्रमुख चौकात वाहनांची गर्दी झाली. दुपारची वेळ असल्याने वाहतूक पोलीसही नसल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. प्रत्येकाची पुढे जाण्यासाठी चढाओढ व सिग्नल बंद असल्याने बेशिस्तीचे प्रदर्शनही घडले. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. अवघ्या काही तासाच्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतूक काही काळ मंदावली. विशेष करून ज्या रस्त्यावर कामे सुरू आहेत, त्याठिकाणी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला तर अनेक ठिकाणी खोदून ठेवलेल्या खड्यांमध्ये पाणी भरले.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ओझर परिसरात पावसाने हजेरी लावली. अडीच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह तासभर पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. आठवडे बाजारात शेतकरी व विक्रेत्यांची तारांबळ उडाली. विक्रेते, ग्राहकांना पावसात भिजतव आश्रय घ्यावा लागला. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. गावातील जुनाट वीज तारा आणि गंजलेल्या चीज खांबांमुळे प्रत्येक पावसाळ्यात वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत असत्याची नागरिकांची तक्रार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर मंगळवारी दुपारी पावसाने हजेरी लावली, दुपारी किरकोळ पावसाच्या सरीमुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरती सुटका मिळाली आहे. दरम्यान, आज पहाटे चारच्या सुमारास देखील शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या, यंदा २५ में पासूनच रोहिणी नक्षत्र लागलेले असून, तेव्हापासून चातकासारखी प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने आज अखेर हजेरी लावल्याने त्र्यंबकेश्वरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अजून मान्सूनचे आगमन होणे बाकी असले तरी, मान्सूनपुर्व पहिल्याच पावसाचे आगमन झाले. गेल्या वर्षी ४ मे पासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने सलग दोन महिने मुक्काम कायम ठेवून जनजीवन विस्कळीत केले होते. यंदा पाऊस काहीसा उशीराने येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असला तरी, हवामान खात्याने मंगळवारी दुपारी वादळी वारा, वीजेच्या कडकडाटासह वर्तविलेला अंदाज मात्र खरा ठरला.
मान्सून आला, पण विकासकामे रखडली! नवी मुंबईकरांना पुन्हा गैरसोयींचा सामना?
वणी व परिसरात वादळी पावसाने एकच दाणादाण उडवून दिली. ऐन आठवडे बाजाराच्या दिवशीच पाऊस झाल्याने तारांबळ उडाली. या वादळामुळे लाखौंची उलाढाल असणाऱ्या बाजारात दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वीज पुरवठाही तासनतास खंडित झाला होता. परिसरातील सुमारे शंभर गावे आणि खेडेपाड्यांतून शेतकरी, व्यावसायिक आणि किरकोळ विक्रेते येथे आले होते. बाजार रंगात आलेला असतानाच अचानक आलेल्या वादळामुळे विक्रेत्यांच्या दुकानांची प्लास्टिकची छते उडून गेली, तर अनेकांचा माल हवेत उडाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.