
Ghansoli Crime Sayali Kadam Death
नवी मुंबई: माणसाला क्षणात आलेला अनियंत्रित राग आणि संशयाचे भूत एखाद्याचे हसते-खेळते आयुष्य कसे एका फटक्यात संपवून टाकू शकते, याचा मन हेलावणारा प्रकार घणसोली परिसरात उघडकीस आला आहे. मोबाईलवर आलेल्या एका फोनच्या संशयावरून पतीने केलेल्या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सायली सागर कदम (वय २९, माहेरची सायली शरद लोखंडे) या नवविवाहितेची तब्बल दोन महिने तीन रुग्णालयांत उपचारांची झुंज सुरू होती; मात्र अखेर ४ सप्टेंबर रोजी चेंबूर येथील रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी आरोपी पती सागर कदम याला अटक केली आहे.
रबाळे एमआयडीसीतील एका खासगी कार्यालयात कामाला असलेली सायली अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ (बेपत्ता झाल्याची) तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी शोध घेतला असता सायली आणि सागर रामचंद्र कदम (मूळ रा. महाबळेश्वर, जि. सातारा) यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्या बेपत्ता असण्याच्या काळातच ५ जुलै रोजी सागरने सायलीवर संशय घेऊन तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली होती. या घटनेनंतर ७ जुलै रोजी दोघांनी लग्न केले अन् दोघे घणसोली येथील एका सोसायटीत (सेक्टर-७) राहू लागले. घटना घणसोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने रबाळे एमआयडीसी पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी रबाळे पोलीस ठाण्यात वर्ग केले.
मारहाणीमुळे सायलीच्या पोटातील नाजूक अवयवाला (पॅनक्रियाजला) गंभीर इजा झाली होती. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा पतीवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये आणि नव्याने सुरू झालेला संसार टिकावा म्हणून “मी जिन्यावरून पडून जखमी झाले,” असा खोटा जबाब तिने पोलिसांना दिला होता. परंतु, वेदना असह्य झाल्यावर आणि प्रकृती खालावत गेल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी तिने पोलिसांना पतीच्या अमानुष कृत्याची खरी हकीकत सांगितली.
नेरूळचे डी. वाय. पाटील रुग्णालय, खारघरचे मेडिकव्हर रुग्णालय आणि अखेर चेंबूर येथील झेन रुग्णालय… सायलीच्या कुटुंबीयांनी तिला वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. तिच्यावर गंभीर शस्त्रक्रियाही झाली, मात्र उपचारादरम्यान अतिदक्षता विभागात ( आयसीयु ) तिची दोन महिन्यांची वेदनादायी झुंज अखेर अपूर्ण राहिली. आरोपी पतीला अटक; हत्येचे कलम वाढवले. सायलीच्या मृत्यूनंतर रबाळे पोलिसांनी या गुन्ह्यात कलम वाढवले आहे. आरोपी सागर कदम याला अटक करून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेखर तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणातील आरोपी सागर कदम हा व्यवसाय शिक्षण घेतलेला इंजिनिअर आहे. सध्या तो कंपन्यांमध्ये प्रायव्हेट गाडी चालवण्याचे काम करत होता. चांगले शिक्षण आणि ज्ञान असूनही त्या एका क्षणाच्या अनियंत्रित रागाने सर्वकाही उध्वस्त केले.
जीव घेण्याचा हेतू नव्हता, पण…: मारहाण करताना कदाचित आरोपीचा पत्नीचा जीव घेण्याचा थेट हेतू नसेलही, पण रागाच्या भरात घेतलेला संशय आणि मारलेले फटके एका निष्पाप तरुणीचा बळी घेऊन गेले.
आयुष्यभराचा पश्चात्ताप: एका बाजूला आई-वडिलांची लाडकी लेक कायमची दुरावली, तर दुसऱ्या बाजूला उच्चशिक्षित मुलाने केलेल्या या भयानक कृत्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवरही समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही.
समाजासाठी धडा: शिक्षण हे केवळ नोकरी किंवा पदवीपुरते मर्यादित नसावे, तर ते विचारांवर आणि रागावर ताबा मिळवण्यासाठीही महत्त्वाचे असते. संशयाची ठिणगी पडल्यास हिंसेचा मार्ग न निवडता संयम आणि संवादाने मार्ग काढणे गरजेचे आहे. शून्य मिनिटाचा राग कसा दोन कुटुंबांची पार राखरांगोळी करू शकतो, याचे हे अत्यंत चटका लावणारे जिवंत उदाहरण आहे.