
रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी
एकीकडे वाढते तापमान आणि उकाड्यामुळे नवी मुंबईकर त्रस्त असताना, दुसरीकडे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अचानक वीज कपातीमुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. शहरातील गाव गावठाण, झोपडपट्टीसह विविध नो मध्ये मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांची झोपमोड होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा काही मिनिटांसाठी नव्हे तर तासन्तास खंडित राहत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रात्री अचानक वीज गेल्याने घरांतील पंखे, वातानुकूलित यंत्रणा आणि इतर विद्युत उपकरणे बंद पडतात. उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.(फोटो सौजन्य – istock)
परिवहनमंत्र्यांची संगमेश्वर बसस्थानकाला अचानक भेट; प्रवाशांसोबत वडापावचा घेतला आस्वाद
वीज पुरवठा खंडित होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे अंडरग्राउंड केबलमध्ये निर्माण होणारे बिघाड, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने या केबल्सवर अतिरिक्त ताण येतो. काही ठिकाणी जुन्या झालेल्या केबल्स गरम होऊन जळणे, इन्सुलेशन खराब होणे किंवा तांत्रिक दोष निर्माण होणे अशा घटना घडत आहेत. परिणामी संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा अचानक बंद पडत आहे.तांत्रिक कर्मचाऱ्यांना अशा बिघाडाचा शोध घेऊन दुरुस्ती करण्यासाठी अनेकदा काही तास लागतात. त्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ वीज खंडित राहण्याचा सामना करावा लागत आहे.
वीज पुरवठा खंडित होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सब-स्टेशन आणि मुख्य फीडर लाईनवरील तांत्रिक बिघाड. विजेच्या वाढत्या भारामुळे अनेकदा फीडर ट्रिप होतात. काही वेळा सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा आपोआप बंद होते. परिणामी संपूर्ण विभागातील वीज पुरवठा ठप्प होतो. काही भागांमध्ये नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असतानाही वीज पुरवठा खंडित केला जातो. मात्र नागरिकांना याबाबत वेळेवर माहिती मिळत नसल्याची तक्रार वारंवार केली जात आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाघोबा खिंडीत एसटी बसचा अपघात; सहा प्रवासी जखमी
वीज कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि घरात वैद्यकीय उपकरणांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना बसत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समस्येमुळे अडचणी निर्माण होत आहेत. काही भागांमध्ये लिफ्ट बंद पडल्याने उंच इमारतीतील रहिवाशांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी भूमिगत केबल्सची तातडीने तपासणी करून जुन्या आणि धोकादायक केबल्स बदलण्याची मागणी केली आहे. तसेच सब-स्टेशनची क्षमता वाढवणे, अतिरिक्त फीडरची व्यवस्था करणे, वीज खंडितीबाबत वेळेवर सूचना देणे आणि आपत्कालीन दुरुस्ती पथके अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.