
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा (photo Credit- X)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. केंद्र सरकारने अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. “देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने आधीच जाहीर केले आहे. जे कोणी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवतील, त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल,” असे त्यांनी नमूद केले. केवळ अफवा तयार करणेच नाही, तर प्राप्त झालेला फेक मेसेज फॉरवर्ड करणेही आता गुन्हा ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे.
🕑 2.02pm | 27-3-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/CEL4R5YOQw — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2026
जागतिक संकट काळात इंधन दरवाढीचा भार सर्वसामान्यांवर पडू नये, यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) १० रुपयांची घट केली आहे. पेट्रोल उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून आता केवळ ३ रुपयांवर आणले आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांवरून थेट शून्यावर आणले आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा वाढीव भार आता तेल कंपन्या सोसणार असून, सामान्य ग्राहकांना अधिक दराने इंधन खरेदी करावे लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
“भारताच्या शेजारील देशांमध्ये बिकट परिस्थिती असली, तरी भारतात इंधन आणि घरगुती गॅसची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे किमान एक महिना पुरेल इतका पेट्रोल-डिझेलचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे,” असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे अफवांच्या आधारावर नागरिकांनी पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या प्रकरणावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “देशात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. युद्धासारख्या कठीण काळात संयम बाळगणे महत्त्वाचे असून खोट्या बातम्या पसरवणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे ठरेल,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.