शहरात इंधनाचा 'भडका'! पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक
दोन दिवसांपासून पेट्रोल पंप बंद असल्याने काही पंपावर वादाची ‘ठिणगी’ पडून हाणामाऱ्या होत आहेत. तूर्त पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून अशीच स्थिती राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो, असे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासन कितीही टंचाई नसल्याचा दावा करीत असले तरी गर्दी अन् रांगा वेगळेच चिञ दर्शवत आहे. बुधवारी सकाळपासूनच शहरातील अनेक पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या. काही पेट्रोल पंप चालकांनी तर ‘नो स्टॉक’चा बोर्ड लावून पंप बंद केले. रांगेत थांबलेल्या दुचाकीचालकांना काही प्रमाणात पेट्रोल मिळाले. मात्र, रात्री जवळपास सर्वच पेट्रोल पंप बंद झाल्याने शहरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.
जालना-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंप बुधवार रात्रीपासूनच बंद झालेले पंप गुरुवारीही सुरू झाले नाहीत. पेट्रोलच नसल्यामुळे या महामार्गावरील पेट्रोल पंपावर अनेक अवजड वाहनांसह (ट्रक) चारचाकी वाहने अडकून पडली आहेत. अनेक पेट्रोल पंपचालकांनी ही अवजड वाहनेच पेट्रोल पंपाच्या प्रवेशद्वारावर लावून पेट्रोल पंप बंद केले आहेत. वाहनधारक पेट्रोल पंप चालकांशी पेट्रोलसाठी हुज्जत घालत असल्याने चालकांनी अशी युक्ती केली आहे. बुधवारी रात्री पेट्रोल पंपचालकांनी वाद घालण्यापेक्षा लाईट बंद करून अंधारात राहणे पसंत केले.
शहरात पेट्रोल मिळत नसल्याने औरंगाबादहून जालन्याला जाणाऱ्यांची व जालन्याहून औरंगाबादला येणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. शहराबाहेर पेट्रोल मिळेल म्हणून अनेकांनी ४० ते ५० किमी पर्यंत जात पेट्रोल मिळवण्याची कसरत केली. एवढे करूनही पेट्रोल न मिळाल्याने अनेक वाहनधारकांना वाटेतूनच घरी परतावे लागले. गुरुवारी पंप होतील या आशेने पहाटेपासून वाहनधारक पंपावर गर्दी करुन होते.
विशेष म्हणजे बुधवारी जिल्हा प्रशासनान कुठेही पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅसची कमतरता नाही. नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते. असे असताना अचानक रात्रीतून पेट्रोल पंप बंद होतात, यावर प्रशासन काहीच उपाययोजना करत नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेवरून संशय व्यक्त होत आहे.






