
PM Surya Ghar Free Electricity Scheme
PM Surya Ghar Free Electricity Scheme: घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने देशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २९ मे रोजी देशभरात एका दिवसात विक्रमी १५ हजार घरांवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात आले. त्यापैकी तब्बल ४,७०० घरांवर सौर प्रकल्प उभारून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले असून, ६ लाखांहून अधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या निवडक राज्यांच्या गटात महाराष्ट्राचा समावेश झाल्याबद्दलही कौतुक केले आहे.
राज्यात या योजनेची अंमलबजावणी महावितरणमार्फत केली जात आहे. या योजनेत घरगुती ग्राहकांना छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी थेट अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते.
अर्ज स्वीकृती, प्रत्यक्ष प्रकल्प उभारणी आणि तपासणीनंतर प्रकल्प सुरू करणे हे या योजनेतील महत्त्वाचे टप्पे आहेत. मे महिन्यात देशभर विशेष अभियान राबविण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राने आघाडी घेत टॉपर राज्य म्हणून मान मिळविला आहे.
मे महिन्यात योजनेसाठी राज्यातून ४ लाख ४९ हजार अर्ज प्राप्त झाले असून ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. अर्जांच्या बाबतीत महाराष्ट्रानंतर गुजरात (३ लाख), उत्तर प्रदेश (१ लाख), राजस्थान (४४ हजार) आणि केरळ (३५ हजार) या राज्यांचा क्रमांक लागतो.सौरऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये महाराष्ट्र ५४ हजार प्रकल्पांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत उत्तर प्रदेश ६४ हजार प्रकल्पांसह पहिल्या, गुजरात ३५ हजार, राजस्थान २६ हजार आणि केरळ २० हजार प्रकल्पांसह 4अनुक्रमे पुढील क्रमांकांवर आहेत.
सौरऊर्जा प्रकल्पांच्या तपासणीमध्ये महाराष्ट्राने ६९ हजार प्रकल्पांची तपासणी पूर्ण करून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. उत्तर प्रदेश ६४ हजार, गुजरात ४२ हजार, राजस्थान २७ हजार आणि केरळ १८ हजार प्रकल्पांसह पुढील क्रमांकांवर आहेत. सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे काम नोंदणीकृत कंत्राटदारांमार्फत केले जाते. ग्राहकांना आपल्या पसंतीचा कंत्राटदार निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे. कंत्राटदार नोंदणीमध्ये महाराष्ट्र ४१३ नोंदणीकृत कंत्राटदारांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर असून उत्तर प्रदेश (७७९), गुजरात (२१०), आसाम (१८१) आणि राजस्थान (१७७) ही अन्य प्रमुख राज्ये आहेत.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्राची कामगिरी :
मे महिन्यात प्राप्त अर्ज : ४.४९ लाख (देशात प्रथम)
बसविलेले सौर प्रकल्प : ५४ हजार (देशात द्वितीय)
तपासणी पूर्ण प्रकल्प : ६९ हजार (देशात प्रथम)
नोंदणीकृत कंत्राटदार : ४१३ (देशात द्वितीय)
२९ मे रोजी एका दिवसात बसविलेले प्रकल्प : ४,७०० (देशात प्रथम)
३ किलोवॅट सौर प्रकल्पासाठी अनुदान : ७८ हजार रुपये
६ लाखांहून अधिक घरांवर सौर प्रकल्प बसविणाऱ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राचा समावेश.