मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिर्डीत आजपासून सुरु होत आहे. १ व २ जून रोजी होत असलेल्या या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसाचे नवसंकल्प शिबीर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. या शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. यासाठी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी सहा गट स्थापन करण्यात आले आहेत. हे सहा गट घोषणापत्राच्या अमंलबजावणी संदर्भात रोडमॅप तयार करतील आणि त्यावर समूह चर्चा होईल तर दुसऱ्या दिवशी या सहा गटांच्या अहवालांचे सादरीकण केले जाईल. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
[read_also content=”सोडती नंतर महापालिका निवडणूकीचे चित्र स्पष्ट; काही विद्यमानांना राहिली नाही जागा तर काहींना बदलावे लागणार प्रभाग https://www.navarashtra.com/maharashtra/the-picture-of-municipal-elections-after-the-draw-is-clear-some-existing-ones-have-no-space-left-and-some-will-have-to-change-wards-nrdm-287067.html”]
दरम्यान या कार्यशाळेला पक्ष प्रभारी एच. के. पाटील. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित असतील, असे थोरात यांनी सांगितले.