
Nashik Politics, MLC Election, Devendra Fadnavis, Eknath Shinde,
Nashik Politics: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील बंडखोरीचे आव्हान अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला. पण त्यानंतरही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.
महायुतीतील सूत्रांच्या माहितीनुसार, या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करून नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोकुळ गीते यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई ते नाशिकदरम्यान सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना काही प्रमाणात यश मिळाले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना पाठिंबा दिला आहे.एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याोबत झालेल्या चर्चेनंतर हिरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीच्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.
मात्र गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अद्याप उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांची माघार घडवून आणण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन प्रयत्न करत आहेत. “आम्ही कोणावरही दबाव टाकत नसून केवळ विनंती करत आहोत. गोकुळ गीते सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे,” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट टाळणारे गोकुळ गीते यांची नाशिक विमानतळावर गिरीश महाजन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. जवळपास तासभर चाललेल्या या चर्चेत तोडगा निघण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि गोकुळ गीते यांच्यात झालेल्या संवादानंतर आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते नाशिकमधील बंडखोरी पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रयत्नशील असून, उद्यापर्यंत या तिढ्यावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.