
Supriya Sule
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ” विषारी दारु प्रकरणात मी मुख्यमंत्र्याचे विधान ऐकले, पण पोलिस यंत्रणा असोत वा एक्साईज विभाग दोन्ही खात्यांची चौकशी झाली पाहिजे. असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले. दारु प्रकरणात फक्त अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने काय होणार आहे. पुण्याची पोलीस आणि महाराष्ट्राचे सरकार काय करत आहे, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.
माझी विनंती आहे की, तुम्ही डेटा पाहा केंद्राचा डेटा आहे. गुन्हेगारीत पुणे राज्यात पहिल्या आणि देशात पाचव्या क्रमांकांवर आहे, इथल्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. पण पुण्यात गृहमंत्रालय सपशेल अपयशी झाले आहे. त्यामुळे इथल्या पोलिल आयुक्तांनी याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, यावरही त्यांनी प्रतिक्रीया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”प्रत्येकाच्या काही अडचणी असतात. पण सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यावर बोलायच्या नसतात पण मी त्यावर काही बोलणार नाही. माझ्या प्राजक्त तनपुरेंना शुभेच्छा आहेत.
पण एक निरीक्षण मी मनमोकळेपणाने सांगु इच्छिते की, भाजपचे सगळे नेते काँग्रेसमुक्त भारत म्हणत होते. पण अहिल्यानगर जिल्ह्याकडे पाहिले असता एक राम शिंदे सोडले तर १०० टक्के ओरिजीनल नेतृत्त्व हे काँग्रेसचे आहे. लोकांना बदल हवा होता, पण काय बदललं, जी १०० कुटुंबे काल काँग्रेसमध्ये होती. ती भाजपमध्ये गेली. बदल काय झाला, असा खोचक सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा भाजपला प्रश्न आहे की काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का, पणतुम्ही सगळी काँग्रेस बाजुला करून आपल्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांला भाजपमध्ये संधी देणार, आम्हाला वाटलं होतं. तुमचे सगळे कार्यकर्ते, निष्ठावंत नेते कुठे गेले, असाही सवाल त्यांनी उपस्थित ेला. तेही सोडा आमचे प्रकाशजी जावडेकर कुठे गेले, असाही टोला यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला.
मला या देशात टॅलेंटची कमतरता नाही, ते गेले त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत असताना ते आमच्यासोबत होते. आज विरोधात आहोत. संघर्ष करू आणि नवीन टॅलेंटसह शुन्यातून नवे विश्व उभे करू. असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
शिक्षण क्षेत्रात केंद्र असो वा महाराष्ट्र सरकार असो, मला आश्चर्य वाटते की, एवढं तंत्रज्ञान असताना पेपर फुटतातच कसे, मग पुर्वी जे होतं तेच चांगलं होतं ना, तेव्हा पेपर फुटत नव्हते. यात नुसत्या तंत्रज्ञानाची चूक नाहीये पण आता त्यातही करप्शन आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याला त्याची नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल. या मुलांच्या करियरचा प्रश्न आहे.
काँग्रेसमुक्त भारत नारा देत होते. पण ज्यांच्यावर आरोप झाले, केसेस टाकल्या गेल्या, ते सगळे भाजपमध्ये आहेत. गेल्या वर्षभरातील माझे भाषण काढा, किंवा राहुल गांधी, अखिलेश यादव यां सर्वांची भाषणे काढा, ममता दिदिंपासून आमच्या पर्यंत वारंवार होणाऱ्या महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराबाबत आम्ही सातत्याने बोलत आलो आहोत. आम्ही जेजे म्हटलो आहोत. त्या सगळ्या गोष्टी तुमच्याही डोळ्यासमोर घडल्या आहेत.