
यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल; 'या' तारखेला निघणार माऊलींची पालखी
नीरा : अधिक मासामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल झाला असून, राज्यातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिराने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांच्या भक्तीभावात व उत्साहात मात्र कुठलाही फरक पडलेला नसून ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात वारीची परंपरा यंदाही तेवढ्याच भक्तिभावाने पार पडणार आहे. मात्र यावर्षी वारकऱ्यांची आणि विठुरायाची भेट एक महिना उशिराने होणार आहे.
तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासामुळे यंदा आषाढी वारीचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले आहे. १७ मेपासून सुरू झालेला अधिक मास १५ जूनपर्यंत असल्याने दरवर्षी मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निघणारे पालखी सोहळे यंदा २४ जूनपासून क्रमाक्रमाने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांची अखंड परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीबाबत संतांनी अभंगातून सांगितले आहे.
राज्यातील मानाच्या सात पालख्यांचे प्रस्थान
संत मुक्ताईंची पालखी २४ जून रोजी कोथळी-मुक्ताईनगर येथून प्रस्थान होणार आहे. संत निवृत्तीनाथ महाराज २९ जून रोजी त्र्यंबकेश्वरहून, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज ७ जुलै रोजी अनुक्रमे देहू व पैठणहून प्रस्थान ठेवणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून, तर संत सोपानदेव महाराजांची पालखी १२ जुलै रोजी सासवडहून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, आषाढ शुद्ध दशमी (२४ जुलै) रोजी संत नामदेव महाराज पंढरपूरजवळील इसबावी येथे विसावा पादुकांवर सर्व संतांच्या भेटीस येणार असून, शनिवार दि. २५ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा भक्तिभावात साजरा होणार आहे.
हे सुद्धा वाचा : भोंदूबाबा प्रकरणावरुन सपकाळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी, म्हणाले; आता खरातची…
पालखी मुक्कामासाठी भवानी पेठेतच पर्याय
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामी भवानी पेठेतील पारंपरिक जागा बदलू नये, अशी मागणी भवानी पेठ येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टने केली आहे. पालखीचा मुक्काम सध्याच्या विठोबा मंदिरातून हलवायचा असल्यास तो स. प. महाविद्यालय किंवा इतर ठिकाणी न नेता भवानी पेठेतीलच श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात ठेवावा, असा पर्याय ट्रस्टने सुचविला आहे. याठिकाणी दर्शन व्यवस्था, रथ व्यवस्थापन, वाहनतळ तसेच अश्वजोडी व बैलजोडींसाठीही पुरेशी सुविधा उपलब्ध असल्याचा दावा ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी केला आहे. भवानी पेठेतील मंडळे, संस्था आणि सेवाभावी नागरिकांना या परंपरेतून वंचित राहावे लागू नये, हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.