
दौंड तालुक्यात भेसळयुक्त गुळाचा काळा धंदा, दारूसाठी परराज्यात पुरवठा; विनापरवाना गुऱ्हाळांवर कारवाईची मागणी
पाटस : साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळांमध्ये शुद्ध गुळाऐवजी भेसळयुक्त गुळ तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा भेसळयुक्त गुळ थेट दारू निर्मितीसाठी महाराष्ट्रासह परराज्यात पुरवला जात असल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे अशी अनेक गुऱ्हाळे विनापरवाना आणि बेकायदा सुरू असून त्यांचे चालक-मालक बहुतांश परप्रांतीय आहेत. अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे.
शुद्ध गुळाला बाजारभाव मिळत नसल्याचा फायदा घेत काही गुऱ्हाळधारक दुषीत साखर, रसायने आणि हानिकारक घटक मिसळून कमी खर्चात गुळ तयार करत आहेत. हा भेसळयुक्त गुळ स्थानिक बाजारात न विकता तो थेट बेकायदा दारू निर्मितीसाठी महाराष्ट्रातील काही भागात आणि परराज्यात पाठवला जातो. त्यामुळे राज्याच्या महसुलाचे नुकसान होत असून, आरोग्यासाठीही मोठा धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यातील अनेक गुऱ्हाळांना उत्पादन परवाना, प्रदूषण नियंत्रण मंडळाची एनओसी, कामगार नोंदणी यासारख्या कोणत्याही कायदेशीर परवानग्या नाहीत. तरीही ही गुऱ्हाळे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या गुऱ्हाळांचे चालक आणि मालक हे बहुतांश इतर राज्यांमधील असून त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. मात्र या गुऱ्हाळांवर कोणी कारवाई करण्यास आले तर जागामालक पुढाकार घेत राजकीय पॉवर आणि आर्थिक तडजोड करून जागीच मिटवले जाते.
“शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुटून हा भेसळयुक्त गुळाचा आणि बेकायदा दारूचा धंदा फोफावतोय. विनापरवाना सुरू असलेली गुऱ्हाळे तातडीने सील करावीत. परप्रांतीयांकडून होणाऱ्या या बेकायदा धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलिस, महसूल, अन्न व औषध प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करावी” अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
भेसळयुक्त गुळामुळे खऱ्या गुळाला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने सर्व गुऱ्हाळांची तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि नागरिक करत आहेत. दरम्यान, दौंड तालुक्यात सध्या भेसळयुक्त दुध, दुधाचे पदार्थ, खाद्य तेल, फळे, दुषीत पिण्याचे पाणी तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंमध्ये रासायनिक औषधांचा वापर केला जात आहे.
अन्न औषध प्रशासन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
याबाबत तक्रारी करुन ही पुणे आणि बारामती अन्न औषध प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी दौंड तालुक्यातील होणाऱ्या या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तर काही ठिकाणी कारवाई केल्याचे कागदावर दाखवुन कारवाईचा दिखावा केला जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तालुक्यातील भेसळयुक्त गुळ निर्माण करणाऱ्या गुऱ्हाळांवर तातडीने धाडी टाकून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान अन्न औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.