
वडगावातील एमआयडीसी रस्त्यावर पार्किंगचा विळखा, वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती; तातडीच्या कारवाईची मागणी
वडगाव मावळ : वडगाव-तळेगाव नगरपंचायत हद्दीतील विशाल लॉन्स चौक परिसरातील एमआयडीसी रस्त्यावर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. रस्त्याच्या दुतर्फा डंपर, कंटेनर, ट्रक आणि इतर मालवाहू वाहने तासन्तास उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
विशाल लॉन्स चौक हा एमआयडीसी परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने हा मार्ग दिवसभर गजबजलेला असतो. मात्र, रस्त्यावरच अवजड वाहने उभी केल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहतुकीचा वेग मंदावत आहे. परिणामी अनेकदा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने ओव्हरटेक करताना तसेच रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः सकाळी शाळा आणि कंपन्यांच्या कामकाजाच्या वेळेत तसेच सायंकाळी सुटीनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गंभीर दुर्घटना घडण्याची भीती
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वाहनचालक रस्त्यालगत उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागा किंवा अधिकृत पार्किंगचा वापर न करता मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत आहे. यापूर्वीही या परिसरात किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी
वाहतूक पोलिसांनी या मार्गावर नियमित गस्त वाढवून बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, ‘नो पार्किंग’चे फलक उभारावेत, आवश्यकतेनुसार टोईंग व्हॅनच्या साहाय्याने वाहने हटवावीत तसेच वाहतुकीचे प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि कामगार वर्गातून होत आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि संभाव्य अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.