
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा; पिंपरी-चिंचवडमधील 'या' नावाचीही जोरदार चर्चा
पिंपरी : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) यावेळी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहराला आजवर विधान परिषदेवर प्रतिनिधित्व न मिळाल्याने निर्माण झालेला ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी शहरातील २५ हून अधिक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना भेटून शहराध्यक्ष योगेश बहल यांना उमेदवारी देण्याची लेखी मागणी यावेळी करण्यात आली.
या शिष्टमंडळात माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२५ माजी नगरसेवकांचे ‘देवगिरी’वर शक्तिप्रदर्शन
येत्या १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी राज्यभरातून मोठी चढाओढ आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी धाव घेत आपली दावेदारी भक्कम केली. ३७ पैकी २५ माजी नगरसेवकांसह सुमारे ५० पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी दिल्याची माहिती शहर कार्याध्यक्ष फजल शेख व माजी नगरसेविका वर्षा जगताप यांनी दिली.
हे सुद्धा वाचा : तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण
योगेश बहल यांच्याच नावाचा आग्रह का?
निवेदनात माजी महापौर योगेश बहल यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा दाखला देण्यात आला आहे. बहल यांनी १९९२ पासून सलग सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी पालिकेत: महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, दोन वेळा शहराध्यक्ष अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासाला आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी होईल, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.