
दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती
मुंबईतील शासकीय बैठका आटोपून बारामतीत दाखल होताच त्यांनी ‘सहयोग’ या निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले. या दरबारात शहर व तालुक्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शासकीय कागदपत्रे, पोलीस प्रशासनाशी संबंधित तक्रारी तसेच प्रलंबित विकासकामे अशा विविध विषयांवर नागरिकांनी थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणी केली. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
दिवंगत अजितदादांच्या कार्यपद्धतीची छाप जपतच, स्वतःची ठाम आणि संयमी शैली दाखवत सुनेत्रा पवार यांनी प्रशासनात शिस्त आणि गती या दोन्ही गोष्टींवर भर दिला. “काम वेळेत आणि दर्जेदार झाले पाहिजे,” हा स्पष्ट संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. बारामतीतील सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, शहर सुशोभीकरण, ग्रामीण भागातील विकासकामे आणि विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.
एकदिलाने काम करण्याचा निर्धार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना अधिक वेग कसा देता येईल, निधीचे योग्य नियोजन कसे करावे, तसेच गावपातळीवरील अडचणी तातडीने कशा सोडवाव्यात यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री पवार यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
कामाची झेप बारामतीच्या विकासाला नवी उंची देणारी ठरेल
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासाची नवी दिशा मिळाली होती. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी दाखविलेला सक्रिय पुढाकार कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे. दुःखातून सावरत त्यांनी घेतलेली कामाची झेप बारामतीच्या विकासाला नवी उंची देणारी ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.