संग्रहित फोटो
रांजणी/ रमेश जाधव : आंबेगाव तालुक्यात गॅस सिलेंडर नंतर आता युरिया खतासाठी कृषी दुकानांमध्ये शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर बरोबरच युरिया खताची टंचाई जाणू लागली आहे. आंबेगाव तालुक्यात कृषी खात्याच्या अनेक दुकानांमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक उन्हात उभे राहून शेतकरी या टंचाईचा सामना करत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
इराण – इस्त्राइल युद्धामुळे नैसर्गिक वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. भारतातील युरिया उत्पादन मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे तसेच ओमान, कतार ,सौदी अरेबिया यासारख्या आखाती देशांकडून सुमारे 75 टक्के युरिया आयात केला जातो. केंद्र सरकारने गॅस कोटा ७० टक्क्यांवर मर्यादित केल्याने उत्पादनावर परिणाम झाला असुन त्याचा थेट फटका आता तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. आंबेगाव तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री संघात देखील काही अंशी युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येते. काही शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या दुकानांमध्ये युरिया मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे देखील दिसून येते. शेतकऱ्यांच्या मते उन्हाळी हंगामातील भुईमूग , कांदा आणि भाजीपाला पिकांसाठी युरिया अत्यावश्यक आहे परंतु युरिया टंचाईमुळे खत देण्यास अडचणी येत आहेत. काही ठिकाणी खाजगी विक्रेत्यांकडून काळ्या बाजारात जादा दराने युरियाची विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
गॅस मिळत नाही, युरिया मिळत नाही, घर आणि शेती दोन्ही कसे चालवायचे ? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. महागाई आणि टंचाईच्या दुहेरी फटक्यामुळे ग्रामीण भागातील कामगार वर्ग देखील अडचणीत सापडला असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसते. केंद्र आणि राज्य सरकारकडून खत पुरवठा पुरेसा असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात टंचाई जाणवत आहे. येणाऱ्या हंगामावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती नाकारता येत नाही. पुरवठा साखळी तातडीने सुधारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील भुईमूग आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले आहे. या पिकांना युरिया खताची नितांत आवश्यकता आहे परंतु सध्याची इराण – इस्त्राइल या देशांमध्ये चालल्या युद्धाची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असून, जर युरिया हे खत शेतकऱ्यांच्या शेतीला वेळेवर मिळाले नाही तर त्याचा उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे जाधववाडी (ता.आंबेगाव ) येथील प्रगतशील शेतकरी महेश कुंडलिक जाधव यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांना दणका; 1241 जणांकडून 12 लाख 41 हजार रूपयांचा दंड वसूल






