
खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी
पिके पाण्याखाली, शेतकरी हवालदिल
पश्चिम भागातील चिखलगाव येथे पावसाचा जोर इतका होता की, काढणीला आलेला गहू, कांदा, मका आणि फरशी यांसारखी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कापणी केलेला गहू भिजला असून कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांचा पुढाकार
नुकसानीची भीषणता लक्षात घेता, चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी तातडीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य समीरभाऊ सुपे यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी समीर सुपे यांनी शेतकऱ्यांच्या या संकटकाळात खंबीरपणे पाठिशी राहण्याचे आश्वासन दिले.
समीर सुपे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “प्रशासनाच्या माध्यमातून या भागाचा तातडीने पाहणी दौरा आयोजित केला जाईल. महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून, बाधीत शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार आहोत.”
हे सुद्धा वाचा : पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाला जाग, नालेसफाईची कामे सुरू करणार; आयुक्तांची माहिती
भरपाईची प्रतीक्षा
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याने चिखलगाव परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आता प्रशासनाने विलंब न लावता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.