
बोगस औषध कंपन्यांमुळे कोकणचा हापूस संकटात; राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मोठी मागणी
पुणे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट दर्जाची खते व कीटकनाशके पुरवल्यामुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित औषध कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कृषी आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, गणेश गायकर, सुशांत नाईक, प्रशांत शिंदे यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार उपस्थित होते. बैठकीत शेट्टी यांनी कोकणातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या सुल्तानी संकटाचा पाढाच वाचला.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदार अस्मानी संकटासोबतच औषध कंपन्यांच्या मनमानी कारभाराने होरपळला आहे. केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ३०० कोटी रुपयांची औषधे खरेदी केली आहेत. मात्र, औषध कंपन्यांच्या दरावर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. कीटकनाशके, पीजीआर आणि बुरशीनाशकांचा वापर नेमका कसा करावा, याची माहिती कंपन्यांकडून न दिली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी
आंबा पिकासाठी ७० हून अधिक कंपन्या औषधांची विक्री करत आहेत. या औषधांच्या किमतींमध्ये मोठी तफावत असून, रोखीने व्यवहार केल्यास मूळ किमतीत ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. ही बाब संशयास्पद असून गुणनियंत्रण विभाग केवळ मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी करत असल्यामुळे बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.
हे सुद्धा वाचा : शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट
१९९० पासून नवीन संशोधन कुठे आहे? – बाळा माने
या बैठकीत माजी आमदार बाळा माने यांनी प्रशासनाला धारेवर धरले. १९९० सालापासून गुणनियंत्रण विभाग आणि कृषी विद्यापीठाकडून फळबाग लागवडीसाठी कोणतेही नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात आलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. बोगस कंपन्यांवर विभागाने आतापर्यंत काय कारवाई केली आणि संशोधन विभागाने कीड रोगांवर नेमकी काय भूमिका बजावली, असा जाब त्यांनी विचारला.