
वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पित करण्यात आला आहे. या पुलामुळे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी सक्षम पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी दिवंगत अजित पवार यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, सुरुवातीला या निर्णयावर टीकाही झाली होती; मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा प्रकल्प राबविण्यात आला. आता या पुलामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याबाबत व्यक्त झालेल्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून आयटी क्षेत्रासोबतच ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (GCC) क्षेत्रातही शहराने मोठी झेप घेतली आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी अनेक वर्षांपासून मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल अशी रचना करण्यात आली आहे.
पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे २७७ कोटी रुपये खर्च करून १,७६३ मीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या भागांतील वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प व जोडरस्ते तयार करण्यात आले असून त्यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
हे सुद्धा वाचा : वाहतूक कोंडीतून होणार सुटका? पुणे शहराबाहेरही विस्तारणार मेट्रोचे जाळे