
उन्हाच्या तडाख्यामुळे महावितरणचा मोठा निर्णय; वीज खंडित होण्यापासून दिलासा
पुणे : राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केली जाणारी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे आता दुपारी करण्याऐवजी सकाळी ७ ते ११ या वेळेतच पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या मुख्यालयाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. यामुळे उन्हाच्या तडाख्यात दुपारी वीज खंडित होण्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पावसाळ्यात झाडांच्या फांद्या वीजतारांना लागून होणारे बिघाड, शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र, सध्या अनेक ठिकाणी ही कामे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होती. दुपारच्या कडक उन्हात वीज नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि घरून काम करणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत होते. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने कामाचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
दुरुस्तीसाठी ‘दुपार’ टाळणार
महावितरणने दिलेल्या नव्या सूचनांनुसार, ज्या दिवशी दुरुस्तीचे काम असेल, त्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व कामे आटोपून वीजपुरवठा पूर्ववत करणे बंधनकारक आहे. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामामुळे ज्या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे, त्याची पूर्वसूचना ग्राहकांना एसएमएस किंवा इतर माध्यमांतून देणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
यंत्रणा सज्जतेसाठी विविध कामे
या मोहिमेअंतर्गत वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, गंजलेले वीजखांब आणि जुन्या तारा बदलणे, तुटलेले इन्सुलेटर दुरुस्त करणे, तसेच रोहित्रांचे (ट्रान्सफॉर्मर) ऑइल फिल्टरेशन आणि अर्थिंग तपासणे अशी महत्त्वाची कामे केली जात आहेत. याशिवाय, फिडर पिलरची स्वच्छता आणि नादुरुस्त ‘लाइटनिंग अरेस्टर’ बदलून पावसाळ्यातील वीजपुरवठ्याची पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला जात आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे दुरुस्तीची कामेही वेळेत पूर्ण होतील आणि नागरिकांना दुपारच्या उन्हात वीज कपातीचा सामना करावा लागणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरमहा मिळणार बोनस आणि रजेचे वेतन
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण), महापारेषण आणि महानिर्मितीमधील हजारो कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची माहिती आहे. या सर्व कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणेच बोनस आणि रजेचे वेतन दरमहा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, महावितरणच्या औद्योगिक संबंध विभागाने तसे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. नव्या निर्णयानुसार, नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकीत बोनस आणि रजेचे वेतन मे महिन्याच्या पगारात एकत्रितरीत्या दिले जाणार आहे. यामुळे कपात झालेली प्रलंबित रक्कम कंत्राटी कामगारांना परत मिळणार असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा लाभणार आहे. “प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगारांच्या हक्काचे पैसे त्यांना वेळेवर मिळणार आहेत,” असे कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष नीलेश खरात आणि प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.