
कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी; राहू–खामगाव, खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव
खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. ही जागा हमखास जिंकणार, असा आत्मविश्वास कुल यांना होता. मात्र तिरंगी लढतीत बाबा जगदाळे यांनी बाजी मारली आणि आप्पासाहेब पवार यांचा पराभव झाला.
राहू–खामगाव गटात कुल यांनी आपल्या तीस वर्षांच्या विश्वासू कार्यकर्त्या अनिल सोनवणे यांना संधी दिली होती. राहू हा कुल यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील दोन जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये येथे भाजपने विजय मिळवला होता. मात्र यावेळी मतदारांनी प्रथमच कुल यांच्या विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून दिले. हा निकाल कुल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बोरी–पारधी–केडगाव गटात खुल्या आरक्षणाच्या जागेवर ओबीसी उमेदवार उभा करूनही भाजपला यश मिळाले नाही. येथेही मतदारांनी कुल यांच्या विरोधात कौल देत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून दिले. गोपाळवाडी–कानगाव, वरवंड–पारगाव आणि पाटस–कुरकुंभ जिल्हा परिषद गटातही अशीच परिस्थिती दिसून आली. या सर्व गटांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
तालुक्यातील राजकीय चर्चेनुसार, राष्ट्रवादी पक्षाने तुल्यबळ, जनसंपर्क असलेले, जनतेशी सौजन्याने वागणारे आणि विकासाची तळमळ असणारे उमेदवार दिले होते. दुसरीकडे कुल गटावर दादागिरी, दहशत आणि दबावाच्या राजकारणाचे आरोप होत असून, याच पार्श्वभूमीवर मतदारांनी कुल विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
प्रचारातील नियोजनाचा अभाव
यवत–बोरींभडक गटात भाजपला मिळालेला विजय अपवादात्मक ठरला. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत नाराजी, धनगर समाजाला उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली असंतोषाची भावना, प्रचारातील नियोजनाचा अभाव आणि कार्यकर्त्यांतील अनास्था यामुळे भाजपचा उमेदवार अत्यल्प मतांनी विजयी झाला. मतमोजणीदरम्यान वाद निर्माण होऊन राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते आणि निवडणूक प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे.
जनतेने कुल यांच्या उमेदवाराला नाकारले
राहू गटातील पराभव कुल यांना विशेषतः जिव्हारी लागणारा ठरला आहे. यापूर्वी सलग दोन वेळा राहूची जागा भाजपने जिंकली होती. मात्र यावेळी राहूच्या जनतेने कुल यांच्या उमेदवाराला नाकारत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून दिले. हा निकाल तालुक्यातील राजकारणाला नवे वळण देणारा मानला जात आहे.