सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या च्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून राष्ट्रीय स्मारकाची जोरदार मागणी करण्यात आली असून ते लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने नियोजित जागेवर खाजगी विकसकाचे सुरू असलेले काम स्थगित करण्याचे आदेश दोनच दिवसांपूर्वी जारी करण्यात आले आहेत, त्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंबेडकर अनुयायानकडून कोणत्याही स्वरूपाची घोषणाबाजी तसेच नेत्यांकडून भाषणे करण्यात आली नाहीत. तरी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पश्चिम महाराष्ट्र, पुण्यात येथोचित स्मारक नसल्याची खंत आंबेडकरी अनुयायांमध्ये व नेत्यांमध्ये स्पष्ट जाणवत होती. या आंदोलनामध्ये विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेले सर्वच आंबेडकरी नेते, कार्यकर्ते याशिवाय मुस्लिम समाजासह अन्य समाजाचे नेते, कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होत डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला आपला पाठिंबा जाहीर केला. या ठिय्या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष प्रयत्न करत रास्ते विकास महामंडळाकडून विकासाच्या कामाला स्थगिती मिळवण्याचे पत्र प्राप्त करून घेतले आहे. तसेच याच संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्त यांनी देखील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्याचा परिणाम स्थगितीपत्र लवकर प्राप्त झाले याची जाणीव ठेवत राज्य शासन व वरील दोघांचेही यावेळी अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या आंदोलनाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाठिंबा दर्शवला असून, स्मारकाच्या भूमिकेसोबत आपण आहोत असा विश्वास त्यांनी आंदोलकांना दिला आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील स्मारकासाठी सकारात्मकता दर्शवली होती त्यामुळे आता स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाला आहे, अशी भावना आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केली.
दरम्यान आता शासनाने स्मारकाच्या घोषणेसाठी व प्रत्यक्ष कामासाठी कोणताही विलंब न करता कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा व या स्मारकासाठीची किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची दूरध्वनीवरून माहिती
आंबेडकरी समाजाचे मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनांचा विस्तार करून राष्ट्रीय स्मारक करावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या समन्वयकांना दूरध्वनी करून चर्चा केली. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते सकारात्मक असल्याचे सांगत स्मारकांच्या मागणीसाठी आंबेडकरी समाजाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे अश्वासन मोहोळ यांनी दिले.