सौजन्य - नवराष्ट्र टीम
पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात पुन्हा गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कांदा काढणी सुरू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. शेतात काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवला होता. तसेच शेतातील गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बुधवारी (दि. १) वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली होती. देवगाव, लाखणगाव, पोंदेवाडी, खडकवाडी, लोणी, वाळुंजनगर या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तसेच जनावरांचा हिरवा चारा तसेच मका, आंबा, पालेभाज्या, कलिंगड, फुल बागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे कोंलमडली होती. तसेच पोंदेवाडी विजेचे खांबही पडलेले होते. देवगाव येथील पांडुरंग नथू कोकणे यांच्या घराचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले होते. घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच धान्य पावसाने भिजून गेले आहे.
वळसे पाटील यांनी केली पिकांची पाहणी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी अवकाळी पाऊस व गारपीठीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागांची माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देत नुकसानाचा अहवाल लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे ,बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, रवींद्र करंजखेले, अनिल वाळुंज, शिरीष रोडे , सतीश रोडे, निलेश पडवळ, मनोज रोडे ,बाबाजी गावडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर
भोर शहरासह ग्रामीण भागात सोमवारी झालेल्या अवकाळी गारपीठ आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भर पावसात आणि गारपिठीने काढणीला आलेल्या गहू, कांदा, ज्वारी, यासारख्या रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबा बागांनाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितांची जुळवाजुळव कोलमडली आहे. तर जनावरांसाठी साठवलेला चारा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.






