
पुण्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर व्यापक तयारी; वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस
पुणे : आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी राज्य शासनाने व्यापक नियोजन केले आहे. आळंदी, देहू आणि पालखी मार्गावरील सर्व सुविधा सक्षम करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, विविध विभागांचे मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच पालखी सोहळ्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत विविध विकासकामे पूर्ण झाली असून, आळंदी, देहू आणि पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे.
Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची …
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह विविध मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्यात आले आहेत. यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पुणे विभागाबाहेरील पालख्यांनाही सर्वसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून, पुणे विभागीय आयुक्तांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. डीजेमुक्त वारीसाठी पोलीस प्रशासनाने समन्वयाने प्रयत्न करावेत तसेच वारीची पारंपरिक संस्कृती जपली जावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांवर देण्यात आला विशेष भर
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, पालखी सोहळा प्रमुखांनी केलेल्या मागण्यांनुसार आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महिलांच्या मुक्कामस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गावरील पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगितले. पुणे विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागातील तयारीची माहिती दिली. आळंदी, देहू, पुणे शहर आणि पालखी मार्गावरील विविध ठिकाणी प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम सुरू केले आहे.
वारी सोहळा जगभर पोहोचणार
यंदाच्या आषाढी वारीचे जागतिक स्तरावर प्रसारण करण्यात येणार असून, डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिन्यांद्वारे वारी सोहळा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्राची वारकरी परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पंढरपूरची भक्तीपरंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.