सौजन्य - नवराष्ट्र टीम
कदमवाकवस्ती : कदमवाकवस्ती येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले असून, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला होता आणि अखेर अधिकाऱ्यांना थेट उपोषणस्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी लागली.
अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या सूचनेनुसार पाठविण्यात आलेल्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळात नायब तहसीलदार मयुर बनसोडे, मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे आणि ग्राम महसूल अधिकारी महेश वाघमारे यांचा समावेश होता. त्यांनी बाधित नागरिकांच्या नुकसान भरपाईसंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगत, निधी प्राप्त होताच पात्र लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे मदत देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
जनतेने उचललेले पाऊल प्रभावी
या ठोस आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. उपोषणामुळे प्रशासनाला हालचाल करावी लागली असून, स्थानिक पातळीवरील प्रश्नासाठी जनतेने उचललेले पाऊल प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या आंदोलनाला लोणी काळभोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला बळ देत होते. यावेळी उदय काळभोर, चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, उपसरपंच नासीर पठाण, आकाश काळभोर, अस्मिता लोंढे, संजय भालेराव, सुहास काळभोर, राकेश लोंढे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.
हे सुद्धा वाचा : शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली महागात; तब्बल लाखो रुपयांना तरुणाला घातला गंडा
ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, प्रत्यक्षात नुकसानभरपाई कधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आश्वासनांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जात आहे. उपोषण यशस्वी झाल्यानंतर उपोषणकर्त्या उपसरपंच राजश्री काळभोर यांनी सांगितले की, “हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी भविष्यातही आम्ही लढा देत राहणार आहोत. गरज पडल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू. कदमवाकवस्ती वॉर्ड क्रमांक २ मधील नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कायम सज्ज आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू.”






