भाईंदर / विजय काते : मीरा-भाईंदर महानगरपालिका आयोजित उपक्रमांमधून पुन्हा एकदा प्रशासनाच्या कामकाजातील हलगर्जीपणा समोर आला आहे. ‘माझी वसुंधरा’ मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत लहान मुलांना प्रचंड उन्हाच्या तडाख्यात उघड्यावर बसवून स्पर्धा घेण्यात आली. उन्हाचा पारा चढलेला असताना बंदिस्त जागेऐवजी उघड्या मैदानात अशा प्रकारची स्पर्धा घेण्यात का आली, असा सवाल स्थानिक रहिवासी करत आहेत.
त्याचप्रमाणे, ‘किल्ला सायक्लोथॉन’ स्पर्धेदरम्यानही मनपाचे नियोजन फसले. यासंदर्भात स्पर्धेच्या एक दिवस आधी दैनिक नवराष्ट्रमध्ये उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. परिणामी, स्पर्धेदरम्यान एक सायकलस्वार बॅरीगेट तोडून किल्ल्याजवळून खाली पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. अधिक धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी रुग्णवाहिका किंवा स्वयंसेवक उपस्थित नव्हते. त्यामुळे संबंधित स्पर्धकाला स्वतः सायकल चालवत खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले.
या संपूर्ण प्रकारावर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “जर तुम्हाला योग्य नियोजन करता येत नसेल, तर अशा स्पर्धा आयोजितच करू नका,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “ आपल्याला माहिती नसेल तर असे कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थांना एकत्र घेऊन आपण हे कार्यक्रम करायला हवे होते तसेच त्या संस्थांना सहभागी करून नियोजन करणे आवश्यक होते,” असेही ते म्हणाले.
“स्थानिक नागरिक जर तुमच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील तुमचीच आहे. उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या साऱ्या घटनांमुळे मनपाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, करोडो रुपये खर्च करून अशा नियोजनशून्य उपक्रमांत वेळ व संसाधने वाया घालवू नयेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशीही जोरदार मागणी होत आहे.