
थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार
उन्हाळ्यातील बऱ्याच आरोग्य समस्यांचे मूळ हे आहारात आणि आपल्या पचनसंस्थेत होणाऱ्या बदलांमध्ये दिसून येते. या काळात पित्तामध्ये वाढ होते. आयुर्वेदातही मार्च ते जून हा काळ ‘आदान काळात’ मोडतो. म्हणजे या काळात सूर्याच्या उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतड्यातील स्निग्धता नष्ट होते. त्यामुळे जड अन्न पचत नाही व शरीरात पाण्याची गरज वाढते.
पनवेलमध्ये नुकतीच काविळीची साथ पसरल्याचे चित्र
सध्या शहरांमध्ये भाजी मार्केट, बस स्थानक, रेल्वे स्थानक त्याच प्रमाणे गर्दीच्या ठिकाणी उसाच्या रसवंतीवर त्याच प्रमाणे रस्त्यावर असलेल्या ज्यूस सेंटरवर खूप गर्दी होत आहे. पण यातून बऱ्याचदा कावीळ, टायफॉइडची लागण होते. पनवेलमध्ये नुकतीच काविळीची साथ दिसून आली होती. उन्हाळाच्या दिवसात बर्फाचा गोळा, रस्त्यावरच्या गाड्यांवरचे रंगीत सरबत आणि फळांचा रस पिण्याकडे अनेकांचा कल असतो. थंडावा मिळण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे टाकतात. परंतु सरबत व बर्फ तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी दूषित पाणी वापरले जात असून अश्या ठिकाणी बर्फयुक्त शीत पेय पिण्याचे टाळावे, असा सल्ला आहार तज्ञ डॉ. प्रकाश पाटील यांनी दिला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.