
Raigad News: कर्जतमध्ये टोरंट पॉवर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; जमिनी देण्यास नकार, ग्रामसभेत ठराव मंजूर
कर्जत तालुक्यात पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीत जलविद्युत प्रकल्प टोरंट वीज कंपनी उभारत आहे. टोरेंट पॉवर कंपनी आणि शासनामार्फत सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी एकजुटीचा पवित्रा घेतला आहे. भालीवडी, आंबोट, पोटल, पाली आणि हुमगाव या गावांमधील जमिनी या भूसंपादनात समाविष्ट आहेत. या सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य असलेले शेतकरी मंगेश म्हसे यांनी आवाहन केले आहे. पाली ग्रामस्थांनी आपल्या जमिनी टोरंट प्रकल्पासाठी दिल्या जाणार नाही, अशी भूमिका घेतली असून हा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
तर या प्रकल्पाच्या मुख्य बांधाजवळ असलेल्या मोहमाळवाडी आणि आंबेवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी देखील धरणाच्या हालचाली सुरू झाल्यापासून विरोध कायम ठेवला आहे. धरणाच्या मुख्य बांधाजवळ जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता बनवण्यासाठी शासनाने अधिसूचना जारी केली आहे. पाली गावातील ग्रामस्थ शिवाजी श्रीखंडे यांनी देखील आपली फसवणूक होऊ शकते आणि शासनाच्या कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. तसेच शासनाने आमच्या जमिनीचे दर देखील निश्चित केले नसल्याने आमची जमीन कवडीमोल दराने आम्ही कोणाच्याही घशात घालणार नाही, असा निर्धार या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या भालिवडी येथून पाली गाव आणि पुढे आंबेवाडी पर्यंत रस्ता तयार आहे. असे असताना स्वतंत्र रस्ता तयार करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना लक्षात घेता शेतकरी जमिनी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता शेतक-यांनी जमीन द्यायची नाही यासाठी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही
शासनाने पाली तर्फे कोतवाल खलाटी येथे जाणाऱ्या रस्त्यासाठी पाच गावांमधील जमिनीचे अधिग्रहण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ५.९१ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी पाच गावातील ३९० शेतक-यांच्या काही हेक्टर जमिनीवर बुलडोझर फिरवून रस्ता तयार केला जाणार आहे. जमिनीमध्ये आता भाताच्या पिकाची लागवड केली जात आहे. त्याचवेळी उन्हाळ्यात देखील रस्ता तयार केल्या जाणाऱ्या भागात भाताची शेती केली जाते, हे लक्षात घेता शेतकऱ्याऱ्यांनी तुटपुंज्या रकमेसाठी आपली जमीन देण्यापेक्षा आयुष्यभर शेती करून जमीनदार म्हणून राहू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शासनाने अधिसूचना काढल्यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेली प्रकल्प विरोधी भूमिका टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.