
Raigad News: 15 दिवसांनी अवघा अर्धा तास पाणी! न्हावे गावात भीषण पाणीटंचाई; आंदोलनाचा इशारा
वाढत्या महागाईच्या काळात पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाचे मोठे हाल होत आहेत. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांनाही पाण्याच्या समस्येचा फटका बसत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गावातील मुख्य जलवाहिनीवर काही व्यक्तीनी अनधिकृत जोडण्या घेऊन पाणीचोरी सुरू ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी अशा बेकायदेशीर जोडण्यांवर कारवाई करून त्या तोडण्यात आल्या होत्या. मात्र त्या पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकारामुळे अधिकृत ग्राहकांना मिळणा-या पाण्याचे प्रमाण घटल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
न्हावे गावातील नागरिकांना तब्बल १४ ते १५ दिवसांनी केवळ अर्धा तास पाणी मिळत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- योगेश कुंडलिक पाटील, माजी अध्यक्ष, ग्रामसुधारक मंडळ न्हावे
अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवावे लागत आहे. त्यामुळे पाणी दूषित होण्याचा आणि संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्यापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय बनला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची, पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची तसेच जलवाहिन्याची तपासणी करून नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.