सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक भागामध्ये जमीनीतील माती खरडून निघाली आहे. त्यामुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागामध्ये एका दिवसात जवळपास तिनशे मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे इंदापूर येथे भेट घेऊन केली.
गेल्या चार-पाच दिवसापासून राजू शेट्टी यांनी मराठवाडा, पश्चिम विदर्भातील अतिवृष्टी व पुरबाधित जिल्ह्याचा दौरा केला. विशेषता राज्यातील सर्वाधिक नांदेड, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांना फटका बसला आहे. या जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, उडीद, मका, मूग, फळबागा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नदी व ओढ्याकडेला असणाऱ्या जमिनीमधील पिके पंचनामे करण्यासही शिल्लक राहिलेली नाहीत.
यावेळी शेट्टी यांच्यासोबत सतिश काकडे, पृथ्वीराज जाचक, अमरसिंह कदम, राजेंद्र पाटील अजित बोरकर, धनंजय महामुलकर, नितीन यादव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयात निर्यातीचे बदलते धोरण
मुळातच खते, बि-बियाणे, किटकनाशके, तणनाशके, औषधे यांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने व मजूरी बरोबर महागाई प्रचंड वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. केंद्र सरकारचे आयात निर्यातीचे सातत्याने बदलते धोरण, गडगडलेले बाजारभाव यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे, असे निवेदनात शेट्टी यांनी म्हटले आहे.
आत्महत्येचे संकट गडद हाेईल
राज्यातील पुरग्रस्त व अतिवृष्टी भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाईची मदत न केल्यास शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जाईल. राज्यातील शेतकरी आत्महत्येचे संकट आणखी गडद होईल, अशी भीती शेट्टी यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.