Ratnagiri News: रत्नागिरीच्या किनारपट्टी विकासासाठी ८५.८४ कोटी! पायाभूत सुविधांचा कायापालट
रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमार बांधवांसह पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जेटी निर्माण करणे, जोडरस्ते बांधणे आणि समुद्राच्या उधाणापासून गावांचे रक्षण करण्यासाठी संरक्षक बंधारे उभारणे अशा एकूण ६ मोठ्या प्रकल्पांच्या अंदाजपत्रकांना आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गृह (बंदरे) विभागाने मंगळवारी या सर्व विकासकामांसाठी एकूण ८५ कोटी ८४ लाख ३० हजार ५८४ रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या विकासकामांचे प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यानंतर मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि खनिकर्म मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या आराखड्यांना मंजुरी देण्याचे निश्चित करण्यात आले. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित बस असलेल्या किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.(फोटो सौजन्य – istock)
रत्नागिरी तालुक्यामध्ये मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या दोन पाईल जेट्टींच्या बांधकामांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये जाकिमिऱ्या येथे नवीन पाईल जेट्टी उभारण्यासाठी १४ कोटी ८६ लक्ष ४७ हजार २५२ रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, तालुक्यातील काळबादेवी येथेही पाईप जेट्टीचे निर्माण केले जाणार असून, त्यासाठी १४ कोटी ९८ लक्ष ३२ हजार ६७ रुपयांचा निधी विशेषत्वाने मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही जेट्टींमुळे स्थानिक मच्छीमारांना आपल्या नौका लावण्यासाठी आणि मासळीची वाहतूक करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दापोली तालुक्यातील आडे आणि उटंबर या दोन सागरी केंद्रांचा विकास या निधीतून केला जाईल.. आडे येथे जेट्टी बांधणे आणि त्या अनुषंगाने इतर आवश्यक सोयी-सुविधा विकसित करण्यासाठी १३ कोटी ३७ लक्ष ४७हजार ३३६ रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तर उटंबर येथेही जेट्टी व तत्सम पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ११ कोटी ४१ लक्ष ७६ हजार ९१८ रुपयांचा निधी स्वीकृत करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे दापोली परिसरातील सागरी पर्यटनाला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोठ्या विकास पॅकेजमुळे जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील गावांचे अर्थकारण बदलण्यास मदत होणार असून, मच्छीमार, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना याचा थेट फायदा होणार आहे.
Ratnagiri Politics: ठाकरे सेनेला रत्नागिरीत मोठा धक्का! जिल्हा संपर्क प्रमुख ‘भाजप’च्या वाटेवर
गुहागर तालुक्यातील दोन प्रमुख कामांचा यामध्ये समावेश आहे. अंजनवेल येथील अंजनवेल भोईवाडी जेट्टीपर्यंत जाणाऱ्या जोडरस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी १४ कोटी १० लक्ष ४० हजार ५४४ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली. तसेच, तालुक्यातील पडवे येथील समुद्रकिनाऱ्यावर लाटांच्या तीव्रतेमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी आणि लगतच्या वस्तीला संरक्षण देण्यासाठी आधुनिक संरक्षक बंधारा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी १४ कोटी ९ लक्ष ८६ हजार ४६७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.






