हापूस उत्पादनात घट (फोटो- सोशल मीडिया)
रत्नागिरी जिल्ह्यात हापूस उत्पादनात ९० टक्के घट
कृषी विभागाकडून शिक्कामोर्तब
केवळ ३७ हजार टनाचा अंदाज
गुहागर: कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा आणि काजू पिकावर यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचे अभूतपूर्व सावट पसरले आहे. हवामान बदलामुळे जिल्ह्यातील हापूस उत्पादनात या हंगामात तब्बल ८०. ते ९० टक्क्यांची ऐतिहासिक घट होण्याची भीती कृषी विभागाने १७मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अहवालात व्यक्त केली आहे. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीनुसार हापूसचा यंदाचा हंगाम पूर्णपणे विस्कळीत झाला असून बागायतदार हवालदिल झाले आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्याचा संयुक्त दौरा केला. या दौऱ्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील ६२,२८० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्रातील सरासरी उत्पादन १,८६,८४० मे. टन अपेक्षित असते, मात्र यंदा ते अवघ्या ३७,३६८ मे. टनांवर येऊन ठेपले आहे. प्रतिकूल हवामानामुळे झालेली ही घट गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे.
कोकणच्या ‘लक्ष्मी’वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले, “जिल्हाधिकारी…”
थंडी, तापमानातील अस्थिरतेचा फटका
शास्त्रज्ञांच्या मते दीर्घकाळ राहिलेली थंडी आणि तापमानातील सततची २ घट यामुळे आंब्याच्या झाडांवर नर फुलांचे प्रमाण वाढले आणि संयुक्त फुले घटली. परागीभवन प्रक्रियेत अडथळे आल्याने फळधारणा होऊ शकली नाही. त्यातच पहिल्या मोहोराची मोठ्या प्रमाणावर गळ झाली असून झाडांना पुन्हा मोहोर येत असल्याने काढणीचा हंगामच कोलमडला आहे. ही परिस्थिती – संपूर्ण जिल्ह्यात सारखीच असून – हापूसच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम झाला आहे.
कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारकडून दखल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ ग्वाही
केवळ आंबाच नव्हे तर काजू पिकालाही हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात काजू उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांची घट अपेक्षित असून, १,४२,०२० मे. टन उत्पादनाऐवजी केवळ ७१,०१० मे. टन उत्पादन हाती येण्याची चिन्हे आहेत. थंडी, धुके आणि दव यामुळे काजूचा मोहोर सुकला असून काजू बोंडू आणि बी ची गुणवत्ता खालावल्याने बागायतदारांना दुहेरी आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारकडून दखल
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले. मुंबई येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.






