
रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटी सज्ज; तब्बल 'इतक्या' जादा बसेसचे नियोजन
रत्नागिरी : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागताच पर्यटनासाठी आणि गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. प्रवाशांची ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी तब्बल १००० पेक्षा अधिक जादा बसेसचे नियोजन केले आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी प्रवाशांनी ‘लालपरी’लाच पसंती द्यावी, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. सध्या रत्नागिरी विभागातील ९ आगारांमधून दररोज सुमारे ३० जादा बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. शाळांना पूर्णतः सुट्टी लागल्यानंतर ही गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असून, त्या प्रमाणात बसेसची संख्याही टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख आगारांमधून मुंबई आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या गाड्यांचे जाळे विणण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या प्रमुख शहरांचा समावेश आहे:
ऑनलाइन आरक्षणाला प्रतिसाद
यंदाही प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा एसटीच्या विश्वासाला प्राधान्य दिले आहे. एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ७० टक्के जादा गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग पूर्ण झाले आहे. ऐनवेळी होणारी गर्दी, उष्णतेचा त्रास आणि जागेची अनुपलब्धता टाळण्यासाठी प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा मोबाईल ॲपवरून आपले आरक्षण निश्चित करावे.” असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे
प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष कक्ष
रत्नागिरी विभागातील नऊही आगारांमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. महिलांना तिकीट दरात मिळणारी ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठांना मिळणारी सवलत यामुळे एसटीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रवाशांनी वेळेत बुकिंग करून सुरक्षित प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
धार्मिक स्थळांसाठी विशेष गाड्या
अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर यांसारख्या तीर्थक्षेत्रांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मराठवाडा व विदर्भ संपर्क: मिरज, लातूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, अकोला, नंदुरबार, परभणी आणि बुलढाणा या लांब पल्ल्याच्या मार्गांवरही जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.