
Sadabhau Khot Slams Maharashtra Government over 'Gohatya Bandi Kayda'
पंढरपूर प्रतिनिधी: शासनाने राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला आहे. मात्र या कायद्याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत यांनी शासनाला घरचा आहेर देत सरकारला हस्तक्षेप करायचा असेल तर दारू, गुटखा, गांजा आणि आफूच्या व्यवसायात करावा. शेतकऱ्याच्या शेणामुतात हात घालण्याची गरज नाही असा घरचा आहेर देत. ‘गोहत्या बंदी’ कायद्याला आपला विरोध असून हा कायदा म्हणजे गोपालक हत्या कायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील धायटी येथील शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातून शेती कामासाठी बैल खरेदी केली. ही जनावरे वाहनामध्ये घालून ती सांगोल्याकडे नेत असताना पंढरपूर येथे तथाकथित गोरक्षकांनी वाहन अडविले व ‘ही जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचा आरोप केला’. यावेळी तथाकथित गोरक्षकांनी वाहनचालक व शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरली. मोबाईल काढून घेतले व संबंधित वाहन पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.व ती जनावरे पशुवैद्यकीय दवाखान्यात बांधण्यात आली. सुमारे सहा लाख रुपये किमतीची जनावरे चारा पाण्याविना बांधून ठेवण्यात आली
त्या शेतकऱ्यांनी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली व पोलीसांना वास्तव माहिती दिली. हळणवर यांनी पोलिसांना विनंती केली संबंधित जनावरे ही कत्तलखान्याला जाणारी नसून शेतीत काम करण्यासाठी विकत घेतलेली असून त्याच्या पावत्या व आधार कार्ड ही त्या शेतकऱ्याकडे आहेत. शेतकरी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी शेतकऱ्याकडून स्टॅम्प पेपरवर लेखी घेऊन ती जनावरे त्या शेतकऱ्यांना परत ताब्यात दिली. त्यावेळी माऊली हळणवर यांनी तथाकथित गोरक्षकांच्या चुकीच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला याप्रकरणी अशा बोगस गोरक्षकावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. तर शेतकरी हिताची भूमिका घेतली म्हणून हे तथाकथित गोरक्षक आमच्या जीविकास ही धोका निर्माण करू शकतात त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे.
तत्पूर्वी संध्याकाळी आमदार सदाभाऊ खोत पंढरपूर येथे आले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, तथाकथिक गोरक्षक गोहत्या बंदी कायद्याच्या अडून अनेक उद्योग करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे या तथाकथीत गोरक्षकामुळे शेतकऱ्यांच्या जीवतास धोका निर्माण झाला आहे .अनेक ठिकाणी मारहाण केली जाते लूट केली जाते हे थांबलं पाहिजे.
गोहत्याबंदी कायद्यावर टीका करताना खोत यांनी “हा कायदा आता गोहत्याबंदी कायदा नसून “गोपालक हत्या कायदा” बनल्याचा आरोप केला. या कायद्यामुळे सर्वाधिक फटका गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच बसत असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या गोठ्यात हात घालू नका, हे सरकारला महागात पडेल. शेतकरी या तथाकथित गोरक्षकांना वैतागला आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
“मी सरकारमध्ये असलो तरी सर्वप्रथम शेतकरी आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरीच वाचला नाही तर सदाभाऊ खोत वाचून काय करायचा? त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम लढत राहणार आहे. पशुपालनाचा व्यवसाय हा हजारो वर्षांपासून सुरू असून शेतकरी, व्यापारी, खरेदीदार आणि विक्रेते यांच्या विश्वासावर तो चालत आला आहे. सरकारच्या आश्रयाखाली काही तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“आमच्या जनावरांना पाणी पाजायला, चारा घालायला कोणी येत नाही. मग शेतकऱ्यांच्या गोठ्यात लूटमार करणाऱ्यांना संरक्षण का दिले जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेळ्या, मेंढ्या, बोकड आणि कोंबड्या मोठ्या प्रमाणावर कापल्या जातात, तरी त्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे जनावरे कापली जातात म्हणून त्यांची संख्या घटते, हा दावा चुकीचा आहे. देशी गाईंची संख्या कमी होण्यामागे यांत्रिकीकरण हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी शेतीची सर्व कामे बैलांच्या मदतीने केली जात होती. मात्र ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्रीमुळे बैलांची गरज कमी झाली. त्यामुळे देशी गाई आणि बैलांचे महत्त्वही घटले.
जर सरकारला जनावरांची विक्री थांबवायची असेल तर सरकारनेच गावागावांत जनावरे खरेदी-विक्री केंद्रे सुरू करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. “रेशन दुकानांप्रमाणे सरकारची जनावर खरेदी केंद्रे सुरू करा. शेतकरी त्यांची गाई, म्हशी आणि बैल सरकारकडे विकतील. बाजारभावानुसार सरकारने ती जनावरे खरेदी करून त्यांचा सांभाळ करावा,” असे ते म्हणाले.
गोवंश खरेदी-विक्री आणि गोहत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक पशुपालन व्यवसायात सरकारचा वाढता हस्तक्षेप हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा ठरत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. शेतकऱ्यांच्या जनावरांना जप्त करून त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मला सरकारची भीती वाटत नाही, पण माझ्या शेतकऱ्याची चिंता वाटते. त्याचा संसार कसा चालणार, त्याच्या लेकराबाळांचे शिक्षण कसे होणार, याची काळजी वाटते. सरकारने अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या व्यवसायात हस्तक्षेप सुरू ठेवला तर शेतकरी पूर्णपणे कोलमडून जाईल. सरकारच्या या भूमिकेमुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत.”
बारामती बसस्थानकाचा राज्यात डंका! ‘अ’ वर्गात प्रथम क्रमांक, मिळाले १ कोटींचे पारितोषिक
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण ३५० किलोमीटरचा प्रवास करून परतूर येथून पंढरपूरला आलो असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. “माझा शेतकरी भोळाभाबडा आहे. आज त्याची जनावरेच जप्त करून तुरुंगात टाकण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांची जनावरेही कैद होऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा शेतकऱ्यांवर झालेला मोठा अन्याय आहे,” असे ते म्हणाले.
पेरणीपूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना बैलांची गरज असते. मे महिन्यात शेताची डागडुजी, नांगरणी, पाट मारणे, पाळ धरणे अशी विविध कामे सुरू असतात. त्यामुळे अनेक शेतकरी बाजारातून बैल खरेदी करतात. बीड जिल्ह्यातील बाजारातून सांगोला तालुक्यातील धायटी गावातील शेतकऱ्यांनी बैल खरेदी केले होते आणि त्यांच्याकडे खरेदीच्या पावत्याही होत्या. तरीही त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे खोत यांनी सांगितले.
नालेकामात हलगर्जीपणा भोवला, झोन अधिकारी निलंबित; महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची कडक भूमिका