
Sharad Pawar leaves Delhi for Baramati after Ajit Pawar accidental death
Ajit Pawar Passed Away : बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज एका विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. राज्यातील इतका मोठा नेता गमावणे म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठे नुकसान मानले जात आहे. राजकीय वर्तुळात ही अत्यंत दुःखद बातमी असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचे काका राज्यसभा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे दिल्लीवरुन रवाना झाले आहेत.
खासदार शरद पवार हे राजधानी दिल्लीमध्ये होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमानाच्या अपघातामध्ये निधन झाल्याची वार्ता कळताच शरद पवार हे दिल्लीवरुन बारामतीला रवाना झाले आहेत. शरद पवार हे दिल्लीवरुन विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी शरद पवार यांच्या चेहऱ्यावर अतोनात दुःख दिसून येत होते.
हे देखील वाचा : Ajit Pawar Passed Away : दिलदार नेता हरपला…! सर्वच राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
दिल्लीमध्ये संसदीय बजेट अधिवेशन सुरु होणार होते. यामुळे अनेक खासदार हे दिल्लीमध्ये होते. राज्यसभा खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील दिल्लीमध्ये होत्या. मृत्यूची बातमी कळाल्यानंतर सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या तातडीने महाराष्ट्राकडे येण्यासाठी रवाना झाल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या विमानतळावरुन निघाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या व्यतिरिक्त, विमानात त्यांचे सुरक्षा रक्षक, एक सहाय्यक आणि दोन क्रू मेंबर्स (एक पायलट आणि एक सह-पायलट) होते. सुरुवातीच्या वृत्तानुसार, विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला परंतु ते दिशा बदलली. त्यानंतर विमानाला आग लागली आणि ते पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झाले. अपघाताचे व्हिडिओ देखील समोर येत आहेत, ज्यामध्ये घटनास्थळी विखुरलेले ढिगारे आणि जमिनीवरून धूर निघत असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू; दिवसभरात चार सभा होत्या नियोजित
अजित पवारांच्या मृत्यूवर खासदार संजय राऊत म्हणाले, “ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, हे बेचव आणि अळणी होईल. कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा, रोखठोक, दिलखुलास असे अजित पवारांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज राज्याच्या राजकारणातला काळा दिवस आहे.” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.