Eknath Shinde & Sharad Pawar: राज्यातील सत्ताधारी महायुतीतील कुरबुरी आणि मतभेद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्धदेखील उघड होऊ लागले आहे. या सगळ्यात गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी एकापाठोपाठ दोनदा दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले. त्यांच्या या दिल्ली दौऱ्याची प्रचंड चर्चाही झाली. त्यांच्या या दौऱ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे. “एकनाथ शिंदेंना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा एक स्वभाव आहे तो म्हणजे ते कधीच बोलत नाही. त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पण शरद पवार यांच्या या विधानानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ घडवणारी भूमिका घेणार का,अशी चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रीया दिला आहे. ” शरद पवार ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत.पण बाळासाहेबांचे विचार आणि विकास ही आमची वाटचाल आहे. मी दिल्लीत कुठे गेलो होतो ते सगळ्यांना माहिती आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना भेटलो. आमची वाटचाल सरळ आहे, तिरकस नाही.
दरम्यान, पुढच्या महिन्या नरेंद्र मोदीं ७५ वर्षांचे होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियमाप्रमाणे आणि अलिखित नियमाप्रमाणे नरेंद्र मोदी निवृत्त होणार का,अशीही चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रीया देताना शरद पवार म्हणाले की, “आरएसएस एक शिस्तबद्ध संघटना आहे. एकदा निर्णय झाला तर त्यावर पुन्हा चर्चा होत नाही, थेट अंमलबजावणी केली जाते, त्यामुळे वयाची 75 वर्षे निवृत्ती वयाच्या बाबतीत शिस्तीचे पालन होईल, असे वाटते.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला जोर आला आहे. मात्र, या चर्चेबाबत विचारले असता शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “आम्ही विचारांसोबत जातो. भाजपसोबत कुणी जात असेल तर त्यांच्यासोबत आम्ही नाही,” असे पवार यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, “आमच्याकडे दुसऱ्या फळीतील सर्वजण पक्षाला मजबूत करण्यासाठी सक्षम आहेत. कुणीच कमजोर नाही.” पवार यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला सध्यातरी विराम मिळाल्याचे मानले जात आहे.