मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे.
दरम्यान अशातच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य बांगर यांनी केलं आहे.
[read_also content=”एकनाथ शिंदे मुंबईत कधी येणार?; दीपक केसरकर म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/when-will-eknath-shinde-come-to-mumbai-deepak-kesarkar-said-nrdm-297187.html”]
संतोष बांगर नेमकं काय म्हणाले ?
शिवसेनेला भगदाड पाडून बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांच्या बायका सोडून जातील. त्यांच्या मुलांना कोणीही बायका देणार नाही, असं वादग्रस्त विधान बांगर यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईमधून मतदारसंघात परतलेल्या संतोष बांगर यांनी गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांना थेट संपर्क करण्यासाठी संवाद दौरा सुरू केला आहे. वसमत शहरात संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार संतोष बांगर बोलत होते.