कणकवली (भगवान लोके): मी स्वतंत्र आहे,कोणत्याही पक्षाकडे प्रवेशासाठी गेलेलो नाही,परंतु निलेश राणेंच्या विधानसभेच्या तिकिटासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून नारायण राणे वणवण करीत आहेत.कोकणात राणेंच्या रुपाने सुरू असलेली घराणेशाही मतदारांनी हाणून पडण्याची गरज आहे . आता राणेंची मुले आली ,पुढे नातू येतील.त्यामुळे बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या निलेश राणेंना सच्चे शिवसैनिक स्वीकारणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.
राणे आपल्या कुटुंबासाठी कितीवेळा विविध पक्षांचे कपडे बदलतील?
कणकवली येथील संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बापानंतर मुलगा किंवा मुलगी आमदार,खासदार अशी परिस्थिती दिसून येते. राणे स्वतः भाजपमध्ये असताना त्यांचा मुलगा काँग्रेस मध्ये होता.त्याचा प्रवेश भाजपात करण्यासाठी त्यावेळी त्यांनी धडपड केली.शेवटी कणकवलीच्या एका माजी आमदारांचे हस्ते त्यांचा भाजपात प्रवेश झाला. राणेंचा एक मुलगा हा भाजप मध्ये आहे.आता दुसऱ्या मुलाचे पुनर्वसन व्हावे,यासाठी धडपड सुरू आहे.राणे आपला दुसरा मुलगा आमदार व्हावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत.राणे आपल्या कुटुंबासाठी कितीवेळा विविध पक्षांचे कपडे बदलतील? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी किती राहायचे हे लोकांनी आता ठरवले पाहिजे.
राणेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे
माजी खा.सुधीर सावंत यांनी ज्यावेळी राणे काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करतील,असे वक्तव्य केले होते.तेव्हा राजापूर न्यायालय परिसरात त्यांच्यावर दगडफेक झाली होती.मात्र, काही दिवसातच राणेंनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.राणेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. त्याचा एक संचालक भाजपमध्ये ,एक संचालक शिंदे शिवसेना पक्षात जाणार आहे.आता तुतारी किंवा अन्य पक्षात कोणाला पाठवतात,हे पाहणे महत्वाचे आहे. राणेंचे जुने सहकारी ते ज्या पक्षात जातात तिथे ते जातात. आपली पक्ष निष्ठा बाजूला ठेवून ठेका मिळवून काहीजण समाधान मानतात. मात्र, ज्यांना राजकीय अभिलाषा आहे, त्यांना राणेंनी झाकून ठेवले आहे.राणेंनी आपल्या कुटुंबातील दुसरा आमदार करण्याचे ठरवले आहे.त्यामुळे हा प्रयत्न जनतेने हाणून पाडला पाहिजे. २००५ साली राणेंच्या विरोधात मी विधानसभा लढलो,त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केले.त्यावेळी आपला कमीपणा होवू नये यासाठी राजन तेली यांना राणेंनी आमदार केलं.परंतु आज गरज संपल्यावर राजन तेलीना तिकीट न मिळण्यासाठी राणे प्रयत्न करीत आहेत.
टक्केवारीचे राजकारण करायचे, पैशाचा वापर करून निवडून यायचे
आम्ही २००५ मध्ये राणेंची संगत सोडली.मात्र, आम्ही पक्ष प्रवेशासाठी कोणाच्या दारात फिरलो नाही. आमचे काही जुने सहकारी शिवसैनिक आजही मी त्यांच्या पक्षात प्रवेश करावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे समाजात काही चर्चा होत आहे.मात्र, मी अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल.आता राजकारणात जनतेची लूट करायची आणि टक्केवारीचे राजकारण करायचे, पैशाचा वापर करून निवडून यायचे, हे आम्हाला जमणारे नाही. मतांसाठी पैसे घेतल्यावर जनतेला पुढील ५ वर्षे विकास कामे झाली नाहीत तरी गप्प बसावे लागेल.त्यामुळे याचा विचार जनतेने करावा. शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला, त्यात कमिशन खाण्यात आले . त्याबाबतची संबंधितांची जबाबदारी मतदारांनी ठरवण्याची गरज आहे.आता राणेंच्या घरातील राजकारणात तीन, तीन माणसे आहेत.त्यांचे नातू पण मोठे होत आहेत,हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.राणेंनी राजकारणात कोणत्याही आपल्या भावाना आणले नाही.मुलांना आणले. आमच्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांनी झेंडे लावून,कष्ट करून, आंदोलने करून पक्ष वाढवला.पण त्या कार्यकर्त्यांचे योगदान शून्य झाले आहे.बाळासाहेबांच्या शिवसेनेत निलेश राणे जात आहेत,त्या निलेश राणे यांनी बाळासाहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे.ते पाहता त्यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक मतदान करणार का? असा सवाल परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.