(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
Solapur News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे मागील तीन वर्षांपासून थकीत असलेले ऊस बिल मिळावे, या मागणीसाठी ऊस पुरवठा शेतकरी संघटना आणि गोकुळ थकीत ऊस बिल संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी आक्रमक अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर पोहोचला. यावेळी काही शेतकरी झाडावर चढून बसल्याने आंदोलनाला नाट्यमय वळण मिळाले.
शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, गोकुळ साखर कारखान्याकडे २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीतील सुमारे अडीच कोटी रुपयांचे ऊस बिल थकीत आहे. ही रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चार हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
दुपारी एकच्या सुमारास मोर्चा पूनम गेटवर पोहोचल्यानंतर शेतकरी संघर्ष समितीचे अॅड. अमोल पाटील, अरविंद घोडके यांच्यासह काही शेतकरी परिसरातील उंच झाडावर चढून बसले. थकीत ऊस बिलाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय झाडावरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास प्रादेशिक साखर सहसंचालक किरण गायकवाड आंदोलनस्थळी दाखल झाले. प्रशासनाच्या वतीने दक्षिण सोलापूरचे प्रांताधिकारी, तहसीलदार, प्रादेशिक साखर सहसंचालक आणि शेतकरी प्रतिनिधी यांची मंगळवारी दुपारी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
या आश्वासनानंतर झाडावर चढलेले शेतकरी दुपारी तीनच्या सुमारास खाली उतरले. मात्र, थकीत ऊस बिलाचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चालू हंगामातील सुमारे ५० कोटी रुपये मिळाले आहेत; मात्र मागील तीन वर्षांपासूनची अडीच कोटी रुपयांची थकीत रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे या रकमेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, थकीत ऊस बिल कधी मिळणार, याबाबत ठोस माहिती मिळाल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लोहगाव येथील महिला शेतकरी महादेवी बंडगर यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा सुमारे ४० टन ऊस गोकुळ साखर कारखान्याकडे गेला असून, अद्याप त्याचे बिल मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कष्टाचे पैसे अडकून पडल्याने महादेवी बंडगर भावुक झाल्या. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे यांनी त्यांचे अश्रू पुसत त्यांना धीर दिला. या प्रसंगामुळे आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरीही भावनिक झाले.
ऊस कारखान्याला देऊन बराच कालावधी उलटला, मात्र हक्काचे पैसे मिळत नसल्याने कुटुंबाचा आर्थिक गाडा कसा चालवायचा, असा सवाल महादेवी बंडगर यांनी उपस्थित केला.
आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…
थकीत ऊस बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगळवारी प्रशासन, साखर विभागाचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक किरण गायकवाड आणि तहसीलदार किरण जमदाडे यांच्या आश्वासनानंतर शेतकरी झाडावरून खाली उतरले. या बैठकीत थकीत बिलाची सद्यस्थिती, कारखाना प्रशासनाची भूमिका आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे कधी मिळणार, याबाबत चर्चा होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार






