गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर 'या' वाहनांना बंदी
१६ टन किंवा त्यापेक्षा अधिक Gross Weight असलेल्या अवजड वाहनांना हे निर्बंध लागू असतील. विशेषतः ट्रक, ट्रेलर तसेच रेती-वाळू आणि इतर अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गणेशमूर्तींचे आगमन आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा वाढता प्रवास लक्षात घेऊन ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असेल.
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा
पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनानंतर मुंबईकडे परतीचा प्रवास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश करता येणार नाही.
गौरी-गणपती विसर्जन आणि त्यानंतरच्या परतीच्या प्रवासासाठी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत.
अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर कोकणातून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असेल.
अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ नये म्हणून काही वाहनांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे. JNPT आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने तसेच दूध, पेट्रोल, डिझेल, LPG सिलिंडर, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य आणि नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत असेल. रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांनाही हे निर्बंध लागू होणार नाहीत.
वाहतूक परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंधांमध्ये आवश्यकतेनुसार शिथिलता देण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात NH-66 वरून प्रवास करणाऱ्यांनी निघण्यापूर्वी स्थानिक वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे लक्ष देणे उपयुक्त ठरेल.






